Wednesday, October 23, 2019

हो.... बड्डे अमोल

     हो.... बड्डे अमोल, हो बड्डे अमोल
     परवा २१ तारखेला माझा तारखेनुसार वाढदिवस होता. तारखेनुसार म्हणण्याच एक कारण आहे. योगायोगाने माझा जन्म झाला त्यावर्षी २१ ऑक्टोबर आणि दसरा एकाच दिवशी होता. घरच्यांंना तेव्हा तारखेपेक्षा मुहूर्त चांगला वाटला. तसही ग्रामीण भागात अजूनही एक पिढी मराठी कँलेंडर प्रमाणेच    महिने-वर्षे यांचे मोजमाप करते. आणि म्हणून वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत माझा वाढदिवस आईवडिलांनी दसऱ्याच्या मुहूर्तावरच केला. १२ वी नंतर शिक्षणासाठी घर सोडून बाहेर पडल्यापासून माझा वाढदिवस मित्रांनी तारखेनुसार साजरा केला कारण ही ग्लोबल पिढी इंग्रजी कँलेंडरनुसार चालणारी आहे.
      तर झाल असं की, यावर्षी माझा वाढदिवस आणि महाराष्ट्र विधानसभेचे सार्वत्रिक मतदान एकाच दिवशी आले. दिवसाची सुरुवातच मतदान करून झाली. पुढे पूर्ण दिवस शुभेच्छा स्वीकारण्यात आणि प्रत्येकाचे वैयक्तिक आभार मानन्यात जाणार हे अगोदरच माहिती होत. दिवसभर अनेक शुभचिंतकांनी शुभेच्छा दिल्या. एकंदरीतच दिवस चांगला गेला. संध्याकाळी घरी आल्यावर शेजारी राहणाऱ्या पमाकाकू माझे वडील आणि आजीकडे गप्पा मारायला आल्या होत्या. गावगाड्यात अजूनही शेजारधर्म जिवंत आहे. शेतशिवाराच्या, पावसापाण्याच्या आणि एकमेकांच्या सुखदुःखाच्या गप्पा अजूनही घरापुढच्या अंगणात चांदण्याला बसून चालतात. तर पमाकाकूंच खर नाव पमाबाई. पण त्यांच्या बोलक्या स्वभावामुळे आणि आपुलकीने सगळ्यांची चौकशी करण्याच्या स्वभावामुळे त्यांंना आमच्या वयाची पोरं पमाकाकूच म्हणतात. वयाची साठी गाठलेल्या पमाकाकू अनुभवाचं आणि जून्या आठवणींचं गाठोडं उराशी घेऊन आमच्या आज्जीसोबत गुजगोष्टी करायला अधूनमधून घरी येत असतात. रोजगार हमीच्या कामावर त्या सोबतच कामाला जायच्या. तिथेच त्यांच्या तळहातावरच्या रेषा मुजल्या. प्रचंड काबाडकष्ट करून हातावर पोट भरणाऱ्या या पिढीच्या कामाच्या क्षमतेची बरोबरी आत्ताची तरुण पोर करूच शकत नाहीत. पमाकाकू परवाही अशाच गप्पा मारायला आमच्या घरी आल्या होत्या. दिवसभर गाव धुंडाळून आणि मतदानाच्या दिवशी मतदार, उमेदवार, कार्यकर्ते, निवडणूक अधिकारी, सुरक्षा (पोलिस) यंत्रणा या सर्वांच्या कामाचे निरीक्षण करून संध्याकाळी घरी आल्यानंतर आईने माझ औक्षण करण्यासाठी ताट तयार केले. डोक्यावर गांधीटोपी घालून मीही पाटावर बसलो. आईने औक्षण केले. लहानपणी आमचे वाढदिवस साजरे करताना आमची सगळी दोस्तकंपनी, घराशेजारच्या बायका ओवाळायला यायच्या, केक कापताना सगळी दोस्तमंडळी Happy Birthday म्हणून सुरात शुभेच्छा द्यायची. त्यादिवशी आई औक्षण करीत असताना घरी आम्ही आई, आजी , आणि पमाकाकू असे चौघेजणच होतो. आई औक्षण करीत असताना पमाकाकूला Happy Birthday च्या सुराची कमतरता जाणवली आणि त्या उस्फुर्तपणे गाऊ लागल्या. "हो.... बड्डे अमोल, हो.... बड्डे अमोल."
     खरतर हा त्यांचा आतला आवाज होता. त्या त्यांच्या अंतकरणातून आलेल्या शुभेच्छा होत्या. ज्यावेळी भावना अशा उस्फूर्तपणे बाहेर येतात तेव्हा शब्द काय आहेत? भाषा कोणती आहे? याला महत्त्व राहत नाही. ग्रामीण मनाच्या याच भावना असतात एकमेकांविषयीच्या. त्यामुळे नाती टिकविण्यासाठी , आपुलकी जोपासण्यासाठी क्रुत्रिम औपचारिकता करण्याची गरज गावखेड्याला लागत नाही. इथल्या भावनांच्या मातीत प्रेम, आपुलकीचा ओलावा नेहमीच असतो त्यामुळे नात्यांचे, मोठमोठ्या एकत्रित कुटुंबांचे वटवृक्ष इथे जोमाने वाढतात आणि ताठ मानेने ऊन, वारा, पावसाला धीरोदात्तपणे तोंड देतात. पमाकाकूंच्या अंतकरणातून आलेल्या "हो.... बड्डे" च्या शुभेच्छा मला सदैव स्मरणात राहतील.
@अमित जालिंदर शिंदे.
..........................................................................................
टिप-"हो.... बड्डे अमोल" या वाक्यात हो नंतर दिलेले चार ठिपके हे हो चा सूर दाखविण्यासाठी दिले आहेत.

Tuesday, October 15, 2019

अमेझॉन ते आरे: Same story but different script

     अमेझॉन ते आरे: Same story but different script 
ओक्जोकुल हिमनदीला आईसलँड च्या पंतप्रधानांंचे स्मरणपत्र
     जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदलामुळे आईसलँड नावाच्या देशातील ओक्जोकुल नावाची एक हिमनदी नष्ट झाल्याची घटना नुकतीच घडली. आईसलँड चे पंतप्रधान कात्रीन जँक्सोब्सदोत्तीर यांनी या नदीला स्मरणपत्र अर्पण करून श्रद्धांजली देखील वाहिली आहे. हि नदी नष्ट होण्यापाठीमागे दोन मुख्य कारणे सांगितली जात आहेत. 
१) मे २०१९ मध्ये हवेमध्ये वाढलेले ४१५ ppm इतके विक्रमी कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण आणि, 
२) यावर्षीच्या जुलै महिन्यातील सर्वाधिक तापमान. खरतर या वाढलेल्या तापमानालाच Global warming म्हणायच. ग्लोबल वार्मिंग ने फक्त आईसलँड लाच फटका बसलाय अस नाही. संपूर्ण जगभरात मागील २ दशकांमध्ये जागतीक तापमानात ०.८℃ ने वाढ झाली आहे. याचाच परिणाम म्हणून हिमनद्या वितळू लागल्या आहेत. समुद्राची पाणीपातळी वाढू लागली आहे. अनेक छोट्या छोट्या बेटांना या वाढणाऱ्या पाणीपातळीचा आगामी काळात मोठा फटका बसणार आहे. भारतासारख्या मान्सूनवर आधारित असलेल्या देशातील ऋतूचक्रच बदलायला लागलय. भारतातदेखील उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेच्या लाटा  अनुभवायला मिळायला लागल्या आहेत. उष्माघाताने बळी चालले आहेत. चारापाण्याच्या टंचाईमुळे गुराढोरांनादेखील उन्हाळा असह्य होतोय. तर पावसाळ्यात प्रचंड अतिवृष्टीमुळे एकाच वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश,ओडीशा,बिहार असा सर्वत्र नागरीकांना पुराचा सामना करावा लागतोय. ग्लोबल वार्मिंग मुळे पाण्याचे बाष्पीभवन जास्त होतेय. भुजल पातळीत घट होतेय तर वाळवंटीकरणाचा वेग बेसुमार वाढतोय.या घडणाऱ्या गोष्टींची कारणमिमांसा करणे आता गरजेचे आहे. ग्लोबल वार्मिंग म्हणजे नक्की काय आणि ते होतय कशामुळे याच्या मुळाशी आता सर्वसामान्य नागरिकांनी जाणे गरजेचे आहे. रोजच्या जीवनात आता माणसाला गाडी लागते, फ्रिज लागतो, वीज लागते. या गोष्टींशिवाय आता मानवी जीवन पुर्णही होऊ शकत नाही. पण या गोष्टींच्या निर्मितीमुळे किंवा या गोष्टींच्या वापरामुळे निसर्गावर,पर्यावरणावर काय परिणाम होतो याचा विचार आपण करीत नाही. निसर्गाचा समतोळ ढासळतोय म्हणून आता या गोष्टींची निर्मिती किंवा वापर आपण थांबवू शकत नाही हे सत्य आहेच. पण या सत्याचा स्वीकार करीत असताना निसर्गास आपल्याचमुळे होणारी हाणी कशी कमी करता येईल याचा विचार मानवजातीने करायला हवा. निसर्गाचा ढासळणारा समतोल, पृथ्वीचे आणि वातावरणाचे वाढणारे तापमान याला औद्योगिकीकरण हाच घटक प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे. औद्योगिकीकरणातून बाहेर पडणारी प्रदूषके, गाड्यांचा धुर, फ्रिज, एसीमधुन निघणारे वायु, हरीतग्रह वायु या गोष्टींमुळे एकीकडे वातावरणातील कार्बन वाढतोय,पृथ्वीचे  सुरक्षाकवच म्हणून ओळखला जाणार ओझोन फाटतोय तर दुसरीकडे उद्योगधंदे आणि विकासाच्या नावाखाली हजारो-लाखो वृक्षांच्या कत्तली खुद्द सरकारकडून होत आहेत. वृक्ष हा एकच उपाय सध्या वाढणाऱ्या जागतिक तापमानाला आटोक्यात आणू शकतो कारण हवेत वाढणारा कार्बन शोषून घेण्याची आणि हवेत गारवा निर्माण करण्याची क्षमता झाडांमध्ये असते. विकासासाठी म्हणजेच पर्यायाने स्वताच्या सुखसोयीसाठी आता उद्योगधंदे, गाड्या आणि यंत्रांचा वापर आपण थांबवू शकत नसलो तरी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आपण निश्चितच करु शकतो. असे असताना पृथ्वी वरील सर्वच विकसित आणि विकसनशील देश जागतिक तापमानवाढीची समस्या आणि त्यावरील उपाय याबाबतीत जागतीक परिषदा घेण्यापुढे जास्त काही करताना दिसत नाहीत. याउलट ब्राझील आणि भारतासारख्या जैवविविधतेने नटलेल्या विकसनशील देशांनी अमेझॉन जंगल असो किंवा आरेच जंगल असो विकासाचा कांगावा करत कशा पद्धतीने चुकीच्या भुमिका घेतल्या हे पाहण अतिशय गरजेच आहे.
अमेझॉन जंगलातील वणवा
     ऑगस्ट २०१९ मध्ये ब्राझीलच्या अमेझॉन जंगलामध्ये ठिकठिकाणी २५०० वणवे लागले होते. या वणव्यांमध्ये लाखो झाडे नष्ट झाली आणि अनेक वैशिष्ट्यपूर्ण वन्यप्राणीही म्रुत्युमुखी पडले. या आगींमुळे निर्माण झालेला धुर ३२०० कि.मी. पर्यंत पसरला होता. ब्राझीलमधील अनेक शहरांमध्ये धुराची चादर पसरली होती पण ब्राझीलचे सरकार या साऱ्या संकटाला गांभीर्याने घेत नव्हते. सारे जग समाजमाध्यमांवर अमेझॉन वाचवा म्हणून ओरडा करत असतान ब्राझीलचे सरकार जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करीत होते. त्याला कारणही तसेच आहे.अमेझॉन च्या खोऱ्यात अमुल्य असा खनिजसंपत्तीचा ठेवा आहे. हा खनिजसंपत्तीचा ठेवा उत्खनन करून बाहेर काढण्यासाठी ब्राझीलीयन सरकारने अमेरिका आणि कँनडातील काही कंपन्यांशी करार केलेले आहेत. आणि उत्खनन करण्याअगोदर ही जमीन मोकळी व्हावी या उद्देशाने त्यांनी या वणव्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ब्राझील सरकारवर जगभरातून होतोय. ब्राझील सरकारने या वणव्यांकडे इतके दुर्लक्ष केले होते की वणवे वेळीच आटोक्यात आणलेत तर ठीक नाहीतर फ्रान्स ब्राझील आर्थिक संबंधांवर विपरीत परीणाम होतील अशी धमकी फ्रान्स ला द्यावी लागली. वास्तविक दरवर्षी लाखो टन कार्बन उत्सर्जन शोषून घेणारे अमेझॉन जंगल प्रतिमिनीटाला एका फुटबॉल मैदानाएवढे प्रचंड वेगाने कमी होऊ लागले आहे. तरीही इथल्या जाईर बोल्सोनारो सरकारने जंगलतोडीवरची बंदी उठवली आहे. केवळ खनिजसंपत्तीचे उत्खनन करून देशामध्ये औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हजारो लाखो झाडांची कत्तल ब्राझील सरकार करत आहे.
आरे जंगलातील झाडे तोडताना
      जे ब्राझीलमध्ये झाले तेच ४ ऑक्टोबर ला मुंबईतल्या आरे जंगलामध्ये झाले. वास्तविक आरे जंगल आहे की नाही यावरूनच येथे न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला. शुक्रवारी ४ ऑक्टोबर ला मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरण प्रेमी लोकांच्या याचिका फेटाळताच मुंबई मेट्रो च्या अधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने संगणमताने आरे परिसरामध्ये जमावबंदी लागू करून जंगलतोडीस सुरुवात केली. आरे परिसरातल्या सामान्य नागरिकांतुन प्रचंड जनक्षोभ होत असतानादेखील अनेक पर्यावरण वाद्यांना अटक करून सलग ४८ तास आरेच्या जंगलामध्ये २००० हुन अधिक झाडांची कत्तल केली गेली. मुंबईतील विधीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आणि सोमवारी म्हणजेच ७ ऑक्टोबर ला तातडीची सुनावणी घेऊन आरेच्या जंगलतोडीस तात्पुरती स्थगिती दिली पण तोवर मुंबई मेट्रो ला हव्या असलेल्या जमीनीवरील झाडे कापून झाली होती. ब्राझील चे अमेझॉन असेल किंवा मुंबई तले आरे असेल. विकासाच्या नावाखाली जंगलतोड हाच दोन्ही ठिकाणचा समान धागा आहे. अमेझॉन आणि आरे हि बेसुमार जंगलतोडीची फक्त प्रतिकात्मक उदाहरणे आहेत. 
     मागच्या वर्षभरापासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आणि झाडांचा हिरवागार शालू पांघरलेल्या कोकणामध्ये कोट्यावधी झाडे उन्मळून पडली. नव्याने होऊ घातलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन च्या कामासाठी ठाणे,भिवंडी,पालघर येथे १५०००० हुन अधिक खारफुटीची झाडे कापावी लागणार आहेत. एकीकडे अशी बेसुमार वृक्षतोड आमचीच सरकारे करतात अन दुसरीकडे कोट्यावधी वृक्षलागवडीच्या मोहिमादेखील आमचीच सरकारे करत आहेत. खरतर २०१६ ला २ कोटी वृक्ष, २०१७ ला ४ कोटी वृक्ष, २०१८ ला १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र राज्याने सलग ३ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड नोंदवले. पण लावलेल्या या कोट्यावधी वृक्षांमधले किती वृक्ष आज जीवंत आहेत किंवा किती रोपांचे संगोपन सरकारने केले हा खरोखर संशोधनाचा विषय आहे.
विकास व्हावा जरूर व्हावा. उद्योग यावेत. रोजगार निर्माण व्हावेत. परंतु बेसुमार वृक्षतोड थांबायला हवी. कारण नवीन वृक्ष लावून ते जगविणे आपल्याला जमत नसेल तर असलेले वृक्ष तोडण्याचा आपल्याला अधिकार नाही. खरतर निसर्गाचा मनमुराद आनंद सगळ्यांना हवा असतो पण तो निसर्ग जपायला, त्याची काळजी घ्यायला, झाडे लावायला आणि जगवायला कुणालाच वेळ नाही. सरकारे दर ५ वर्षाला बदलतात. वेळोवेळी त्यांची धोरणे बदलतात. ५ वर्षात कुठल्याच झाडाचा वृक्ष होत नाही. वृक्ष व्हायला त्याची पाळेमुळे जमीनीत खोलवर घट्ट व्हावी लागतात. त्याच्या फांद्यांनी सभोवतालचे अवकाश व्यापून घ्यावे लागते. ढगांना कवेत घ्यावे लागते. रोपट्याचा वृक्ष होण्यासाठी ऊन ,वारा, पाऊस यांच्याशी अविरत झगडा करून ताठ मानेने  परत उभा राहावे लागते. त्यामुळे आपल्या मुलाबाळांसाठी हि पृथ्वी जीवंत ठेवायची असेल. तर जगातल्या प्रत्येक व्यक्तिने निसर्गाचा आदर राखून झाडे लावायला हवीत आणि त्यांचा वृक्ष होईपर्यंत त्याची काळजी घ्यायला हवी. Global warming ला जर Green earth हेच उत्तर असेल तर झाडे लावण्याची जागतिक लोकचळवळ व्हायला हवी. हाच पर्याय आहे शाश्वत विकासाचा. 
@अमित जालिंदर शिंदे

Tuesday, October 1, 2019

आदरणीय बापूजी, तुम्ही अमर आहात.

 आदरणीय बापूजी,
 तुम्ही अमर आहात.                                                     
    

     आदरणीय बापूजी, मागील काही दीवसांमध्ये तुमच्या पुतळ्यावर एका साध्वीने गोळ्या घातल्या. पण बापू यात तुमचा मृत्यू झाला नाही कारण तुम्ही तुमच्या कार्याने या अगोदरच अमर झाला आहात.   स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर तुमच्या हत्येपर्यंत तुमच्यावर नऊवेळा शस्त्रास्त्र हल्ले झाले. खरतर कुठलही बुलेट प्रुफ जँकेट घातलेल नसताना. आयुष्यात कधी शस्त्राला हात लावलेला नसताना तुमच्यावर नऊ शस्त्रास्त्र हल्ले झाले. यावरूनच तुमच्या ताकदीचा अंदाज आम्हाला येतो. बापू पाचगणीला नथुराम सुरा घेऊन तुमच्या मागे लागला तेव्हा तुमच्या अनुयायांपासून नथुरामला तुम्हीच वाचवले. ज्या नथुरामला तुम्ही वाचवले त्याच नथुरामने पुढे तुमचा घात केला. आज तुमच्या मृत्यूपश्चात ७० वर्षांनी त्याच नथुरामचे चाहते तुमच्यावर परत गोळ्या झाडतात. कारण ७० वर्षांपूर्वी आणि आज ७० वर्षानंतर देखील ते फक्त तुमच्या देहावर गोळ्या घालू शकले. विचारांवर नाही. तुमचे विचार आजही आमच्यासारख्या तरुणांच्या मनावर गारुड घालून बसलेत.

    बापू, खेद एकाच गोष्टीचा वाटतो. तीन गोळ्या लागल्यानंतर तुम्ही राम नामाचा जप करत प्राण सोडलात. त्यावेळी तुमच्यावर गोळ्या घालणाऱ्या नथु'राम' च्या नावात राम आहे. आज तुमच्या पुतळ्यावर गोळ्या घालणाऱ्या साध्वी देखील रामाचेच नाव घेऊन स्वत:चे अस्तित्व टिकवते आहे. मग बापू तुमचा राम आणि त्यांचा राम यात फरक काय आहे??बापू तुम्ही ग्रामस्वराज्यासाठी रामराज्याची संकल्पना मांडत होतात. मग रामाच नाव घेऊन अस्तित्व टिकवणाऱ्यांना रामराज्य मान्य नव्हत का??
   बापू, आज देश तुमच्या जयंतीच हे १५० व वर्ष साजर करतोय. केंद्र सरकार व राज्य सरकार विविध उपक्रम राबवून तुमचे विचार अजरामर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकीकडे सरकार यासाठी प्रयत्न करीत असताना 'नथुराम देशभक्त था' म्हणणाऱ्या विक्रुतीला जनतेन खासदार म्हणून संसदेत पाठवलय याच खर दु:ख वाटतयं. बापू आजच्या तरुण पिढीला जेव्हा आम्ही सेवाग्राम बद्दल विचारतो तेव्हा आमचेच काही तरुण सहकारी 'तिथे झोपड्यांशिवाय आहेच काय??'अस विचारतात. तेव्हा मन सुन्न होत कारण बापू त्याच झोपडीत बसून तुम्ही देशभर स्वातंत्र्याच्या ज्वाळा पेटवल्या होत्या. त्याच झोपडीतून आलेल्या एका हाकेवर उभा हिंदूस्थान एक होऊन लढ्यात उतरत होता. आमच्या तरुण सहकाऱ्यांना सेवाग्राम मधल्या त्या झोपड्यांची ताकद आणि तिथुन मिळणाऱ्या देशभक्तीच्या ऊर्जेची महती सांगण्यात आम्हीच कमी पडलो. त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. तुमच क्षमाशील व्यक्तिमत्त्व मला क्षमा करील आणि तुमच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी शक्ती देईल एवढीच माफक अपेक्षा. भारतावर अनेक राजांनी महाराजांनी राज्य केलं. पण काश्मिर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि लाहोर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत अखंड भारताने नेतृत्व मान्य केलेली तुम्ही पहिली व्यक्ती होतात.
     बापू, तुमच्या नावाची पांढरी गांधीटोपी घालून जेव्हा सुमार लोक उसण्या देशभक्तीबद्दल बोलतात तेव्हा माझ्यासारख्याला त्यांच्याकडून एकच अपेक्षा असते. स्वतःच्या स्वार्थी पोळ्या भाजण्यासाठी गांधी टोपी घालून खोट बोलण्यापेक्षा त्या टोपीतला विचार टोपीखालच्या डोक्यात पाझरु द्यात. बापू तुम्ही आत्मटिका करून स्वतःच्या चुका स्वतः सुधारत होतात. अलिकडे समाजात स्वतःची चुकच मान्य न करण्याची प्रवृत्ती वैगाने फैलावताना पाहिल्यावर जगभरात तुमच्या नावाने ओळखला जाणारा हा भारत देश खरच तुमचा राहिलाय का??असा प्रश्न पडतो. 
    बापू, सत्य अहिंसा आणि प्रेमाणे जग जिंकण्याचा तुमचा विचार आजच्या प्रत्येक तरुणाने अंगिकारला पाहिजे. ग्रामस्वराज्यासाठी रामराज्याची तुमची संकल्पना आजदेखील अंमलात आणण्याची गरज आहे. तुमची क्षमाशील व्रत्ती आणि औदार्य यांचे समाजामध्ये बीजारोपण होऊन शांत, सुखी, आणि सामाजिक सलोख्याने भारलेला समाज निर्माण व्हायला हवा. बापू संकल्प करतो या सगळ्या गोष्टींसाठी मी माझा खारीचा वाटा निश्चितपणाने उचलेन आणि इतरांनादेखील त्याची जाणीव करून देईन. आत्मटिका करुन स्वतःचे व्यक्तिमत्त्व पारदर्शक घडविण्याचा तुमचा गुण मी स्वतः आत्मसात करून माझ्या सहकाऱ्यांमधेही रुजविण्याचा प्रयत्न करीन. बापू यासाठी तुम्ही मला नेहमीच आशिर्वाद द्याल आणि तुमच्या विचाराची साथही द्याल एवढीच अपेक्षा करतो आणि तुम्हाला स्मरण करुन आदरांजली वाहातो.
बापू तुम्ही अमर आहात आणि अमर राहा.

                                                             तुमचाच 
                                               @अमित जालिंदर शिंदे

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...