Tuesday, January 30, 2018

म्हणुनच की काय मला सकाळची शाळा खूप आवडायची

म्हणुनच की काय मला सकाळची शाळा खूप आवडायची
आमच्या भाषेत सकाळची,आज्जीच्या भाषेत बेस्तुर वार ची एकपारगी शाळा असायची,
उशिरा उठल्यामुळे माझी ग्रहापाठाची वही रिकामीच असायची,
शाळेला जाताना सकाळच्या प्रहरी थंडी जरा जास्तच असायची,
तेव्हा मास्तरांची छडी जरा जास्तच लागायची,
शाळा लवकर सुटायची,
तेव्हा आज्जी नेमाने बेस्तूर वार चा उपास करायची,
त्यामुळे दुपारी शाबुची खिचडी खायला मिळायची,
 म्हणूनच की काय मला सकाळची शाळा खूपच आवडायची.
घरी आल्यावर मित्रांची लपाछपी, सुरपारंब्या खेळायची तयारी असायची,
आमच्या आजोबांची मात्र आम्हाला न्हाव्याकडे हजामतीला न्यायची घाई असायची,
तिकडे आज्जीची आजोबांकडे बाजारात विकायला अंडी द्यायची घाई असायची,
हजामती नंतर आम्हाला बाजारातील भजी खायला मिळायची,
आणि म्हणूनच की काय मला सकाळची शाळा खूपच आवडायची.
घरी आल्यावर आई घासून अंघोळ घालायची,
आठवड्याभराची दुर्गंधी क्षणात दुर व्हायची,
तोवर सांज झालेली असायची,
सगळीकडे दिवेलागणीची तयारी सुरु असायची आणि आई अभ्यास करा म्हणून पाठी लागायची,
आम्ही भावंडांनी लागलीच अभ्यासाची नाटकी करायची,
निष्कारण पेन्सिल- खोडरबर साठी भांडण करायची,
तोवर पप्पांची एन्ट्री व्हायची,
आम्ही लगेच वाह्यापुस्टके हातात घ्यायची,
पोरं अभ्यास करताना पाहून पप्पांनी चॉकलेट द्यायची
आणि म्हणूनच की काय मला सकाळची शाळा खूपच आवडायची .
@अमित जालिंदर शिंदे

Tuesday, January 23, 2018

आठवणींचे पत्र...



     संस्कृती ही अशीच आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असते आणि हा वसा आपल्या माय मराठी मातीचा आपण पुढच्या पिढीला द्यायचा..तोच आपल्या मनात दरवळणारा ओल्या मातीचा सुगंध म्हणजे हा मृद्गंध’ आपला हाच संस्कृतीचा वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी, आपल्या मनातील मृद्गंध आपल्या वारसांना पोहोचविण्यासाठी कला  हे माध्यम म्हणून काम करीत असतात.असाच ६४ कला आणि १४ विद्यांचा संगम असलेला,मातीतच जन्मलेल्या शेतकरी भुमिपुत्रांनी आपल्या कलाविष्कारांनी साकारलेला, संगीत,गायण,वादन,नाट्य,नृत्य, आणि सर्वप्रिय अशा शेलापागोट्यांच्या फुलपाकळ्यांनी सजलेला,बहरलेला आजचा हा दीमाखदार सोहळा म्हणजे मृद्गंध २०१८,या मृद्गंध च्या निमित्ताने आपल्या सर्वांना म्हणजेच AGRICOS-2014 BATCH ला उद्देशून                                                                   
प्रिय मित्र मैत्रिणींनो
नमस्कार🙏🏻,
      दि-१९/०८/२०१४;आपण सर्वांनी प्रथम वर्ष कृषि पदवीच्या वर्गामध्ये प्रवेश केला.याचक्षणी आपल्यापैकी काही जणांची कृषिला प्रवेश घेण्याची स्वप्ने पूर्ण झाली,तर काहीजण स्वतःची इंजिनीरिंग आणि मेडीकल ची भंगलेली स्वप्ने भूतकाळाच्या गाभाऱ्यात सोडून नवीन ऊर्जेने शेतकरी, अधिकारी,शास्त्रज्ञ होण्यासाठी बी.एस.सी.(ऍग्री) च्या उंबरठ्यावर आलो.या महाविद्यालयातील १२० जणांची आपली पहिलीच बॅच होती.आपण नियमित कॉलेजला येऊ लागलो.नंतर ही नियमितता अवघड-अवघड कॉन्सेप्ट न समजण्याने कमी झाली.ते सॉईल, बायोटेक,पॅथ कधी समजलच नाही ओ;आणि बाकीचे अॅग्रो,हॉर्ट,जे सोप्प होत ते लक्षात कधी राहीलच नाही.ह्या काळात काहीजणांना ह्या वातावरणाशी जुळवून घ्यायला,घरापासून दुर राहायची सवय व्हायला थोडा वेळ लागला.तितक्यात नोटिस बोर्डांच्या काचा मयुरपंख, स्पोर्टस्,आणि अविष्कारच्या नोटीसांनी चमकू लागल्या.आपल्या बॅचनेही या स्पर्धांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला.पहिल्या वर्षी विशेष गुणवत्ता कुणालाही मिळाली नसली तरी सहभागाचा तो प्रतिसाद दापोलीला आवाज चढवून सांगत होता, "अगले साल आयेंगे तो चॅम्पियन बनके जायेंगे". त्या पराभवातूनच पुढच्या वर्षीच्या विजयाच्या तयारीसाठी १२ हत्तींच बळ मिळालं होत;आणि म्हणूनच की काय दुसऱ्या वर्षी आपण तब्बल ५ बक्षिसे मयुरपंख आणि तितकीच अॅथलेटीक्समध्ये मिळवुन विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळविला.दुसऱ्या बाजूला पहिल्याच सत्र परीक्षेला एक्स्टर्णल म्हणून आलेल्या पागरकर सरांनी "MAKE A SINGLE FOLD" म्हणत म्हणत घामचं फोडला की राव.त्यानंतर झालेल्या पहिल्या वर्षातील पहिल्याच महाविद्यालयीन गॅदरींग,स्पोर्टस् मधील आपल्या क्लास मधील जिगरबाज खेळाडू आणि कलाकारांच्या डोळे दिपवणाऱ्या कामगिरीने आपलाच डंका वाजवला.फर्स्ट इअर चा अपवाद वगळता सलग ३ वर्षे आपण निर्विवादपणे जनरल चॅम्पियनशिप वर दिमाखात राज्य करतोय.
          आपल्या अनेक आठवणी चिरकाल टिकणाऱ्या आहेत.दुसऱ्या सत्रात राणेकाकांना  फसवुन फोंड्याची एंट्री करून घोणसरी डॅमला दिलेली व्हिजीट, हॉस्टेलच्या पाठीमागच्या खाणीमध्ये मनमुरादपणे घेतलेल्या डुंबण्याच्या आठवणी,पाठीमागच्या टेकड्यांमध्ये करवंदाची जाळी शोधता शोधता कोंडये-करंजे पर्यंतची बेभानपणे केलेली पायपीट ,एरवी एकमेकांशी कमीच बोलणाऱ्या आपण मेसमध्ये मात्र एकमेकांना मुद्दाम हाका मारायचो आणि उगीचच सरावलेल्या पुढाऱ्यांप्रमाणे म्हणायचं नमस्कार आमदार साहेब वगैरे, वगैरे...
        आबांच्या हातून काही पडूनच बघावं आणि या संधीचा फायदा घेऊन आपण बेभानपणे फोड फोड म्हणून ओरडाव हे एक समीकरणच झालेलं होतं.इतकंच नव्हे तर राहुलदादा पुंगावकरांच उगीचच मोठ्ठं बोलणं, राहुलदादा कणवाडेंच नेहमीच कन्फ्युज राहणं,ओंकार कुंजीरच उगीचच राक्षसी हसणं, अमरचं दात न दाखवताच हसणं,अमित जोके,गणेश चव्हाण यांचं क्षणार्धात गोळवणकर सरांच्या कॅरॅक्टर मध्ये घुसनं,सप्रे बंधुंच नेहमीच जगापासून अलिप्त राहणं,शुभम ढाणेच लगेच शास्त्रज्ञ होणं आणि आमच्यासारख्या सामान्यांच्या डोक्यावरून जाईल असं काहीतरी निष्फळ बडबडणे,किशोर च पेडनेकर सरांना घाबरून नेहमीच बाथरूम मध्ये पळण,तर विश्रांतीच्या सगळीचं लेक्चर करण्याच्या सवयीने सगळ्यांनाच येणार डोईजड टेंशन,अमृता भगत आणि माधुरी केंगरे च नेहमीच पेपर सुरू होईपर्यंत वाचत बसणं.ह्या साऱ्या आठवणींनी आज जरी गालांवर स्मितहास्य येत असलं तरी त्यावेळी हेच गाल फुगून टम्म व्हायचे.
       नुसत्या चांगल्याच नव्हे तर काही वाईट आठवणी देखील आपल्यासोबत आहेतच.त्यातली म.गांधी जयंती आपण विसरण कसं शक्य आहे.याचदिवशी झालं होत ना आपलं दोन विंगमधल महाभारत.या महाभारताचे पडसाद तर पुढे वर्षभर शीतयुद्धाच्या रूपाने वेगवेगळ्या कारणांनी पडायचे.त्याकाळात तर फक्त संचारबंदीच लागायची राहिली होती;पण पुढे हरकुळच्या त्या मंतरलेल्या NSS कॅम्प मध्ये इना च्या कोला साँग ला हरकुळ गीत करून बेधुंद नाचलो,त्या कॅम्प मध्ये गोळवणकर सरांनी केलेली ती लावणी,अनुसे सरांनी तापविलेल पाणी आणि आपण रात्रभर काढलेले आवाज प्रयत्न करूनही विसरत नाहीत आणि याच सुंदर दिवसांनी आपल्यातलं शीतयुद्ध शमण्याची बीजे रुजली.आज आपल्या या एकीचा,शांततेचा,विशाल वृक्ष झालाय.
          आपल्या १२० जणांमध्ये काहीजण वाढले काहीजण कमीही झाले पण शिवराज,शिवानी सारखे कलाकार;संदेश, शिवम,रोहन, अर्जुन, श्वेता ,गौरी सारखे खेळाडू;प्रदीप,चरण,प्रियांका,स्नेहल,सारखे टॉपर; सुरज सारखा ऑल राऊंडर;सुहेल,संग्राम सारखे नेते;अमोल बाबर,सागर साळुंके सारखे विचारवंत आणि सोबतच काही दंगेखोर,प्रेमवेडेदेखील होतेच,आपल्या या सगळ्यांच्या सोबत असण्यानेच आपली ४ वर्षे परिपूर्ण होती.यानंतरच्या काळात आपण जेव्हा या विस्तीर्ण समुद्रारुपी स्वातंत्र्यातुन जबाबदारीच्या घागरीत भरले जाऊ तेव्हा या आपल्या सर्वांच्या सोबतीच्या आठवणींनी आपल्या डोळ्यांमध्ये ओसांडलेल्या घागरीप्रमाने नक्कीच अश्रु ओघळतील.या जगात गांधींसारखी मवाळ आणि हिटलर सारखी जहाल माणसेच फक्त अमर होतात बाकीचे कालौघात कालवश होतात.आपण त्या हिटलरप्रमाने जहाल कधीच होऊ शकणार नाही पण गांधींप्रमाने मवाळ होऊन आपल्यातले मतभेद विसरून शेवटच्या या दिवसांमध्ये पुन्हा एक होऊयात.तेवढीच सुखाच्या ४ क्षणांची चव आयुष्याच्या शिदोरीला बांधता तरी येईल.आणि हो आपण इथून कायमचं नाही जायचं,आपण परत इथे यायचाय,याच व्यासपीठावर यायचय,समाजात स्वतःची कर्तृत्व सिद्ध करून मराठे साहेबांच्या हातून सत्कार स्वीकारण्यासाठी इथ यायचाय.
       सर्वांना भावी आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा💐💐
शतायुषी व्हा!!💐कीर्तिवंत व्हा!!💐💐
                                                                                                            आपला मित्र                                                          अमित जालिंदर शिंदे


ता.क.-मी आपल्या सर्वांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात कमी शब्दांमध्ये जास्त गाभार्थ घेण्याच्या माझ्या प्रयत्नांमुळे मी आपल्या सर्वांच्या नावाचा उल्लेख करु शकलेलो नाही आणि जर माझ्या या लिखाणातून कुणाला माणसिक ठेस पोहोचली असेल तर  मनस्वी क्षमा असावी...

Friday, January 12, 2018

लोकशाही

स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतरदेखील मतांसाठी लावला जातो गुलाल-भंडारा आमच्या माथी,
मटनाचा अर्धवट शिजलेला तुकडा आणि रश्शाच पाणी पिऊन नेत्यांसाठी कार्यकर्ते जागतात काळ्याकुट्ट राती,
नसलेलं अवास्तव प्रेम दाखवुन आणि अस्मितांची भाषणे करून भडकवल्या जातात जाती,
असुरक्षित मतांच्या व्यवहारासाठी ओतली जातात पैशाची पोती,
या साऱ्या गोंधळात होत नाही चांगल्या उमेदवारांची स्वीकृती,
निवडुन येतात त्याच शाही अपवृत्ती,
म्हणुन प्रश्र्न पडतो; हा देश प्रामाणिक प्रचाराचा की जाती,आमीषे आणि पैसासंपत्तीच्या प्रसाराचा??
हा देश लोकशाहीचा की शाही लोकांचा??
@अमित जालिंदर शिंदे

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...