Saturday, December 1, 2018

पाण्यासाठीचा विजयी संघर्ष...

                    पाण्यासाठीचा विजयी संघर्ष...
वरील सर्व छायाचित्रे सदर वर्तमानपत्रांच्या ई-पेपरमधुन घेतले आहेत.

     यंदा सांगोल्यामध्ये पाऊस पडलाच नाही. दुष्काळाची दाहकता इतकी भयानक आहे की यंदा खरीप आणि रबी दोन्ही हंगाम १०० टक्के फेल गेले.डाळिंब,बोरी,पेरू,द्राक्षे अशी फळपिके घेऊन उत्पादनांचे विक्रम करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी पाण्याची अवस्था पाहून फळबागा सोडून दील्या.ज्या शेतकऱ्यांनी धाडसाने पाणी पुरेल या आशेने बागांचे बहर धरले त्यांच्या बागांना नेमकं फळाच्या वाढीच्या काळात पाणी कमी पडू लागलं होत.पाण्याविना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला होता.टेंभू उपसा सिंचन योजनेतुन सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी देखील सांगोल्याला आजपर्यंत मिळत नव्हते.५० वर्षांपूर्वी १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीमधे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काढलेल्या नीरा उजवा कालव्याला अद्याप पर्यंत कधीच पाणी आले नव्हते ते यावर्षी ऑक्टोबर महिन्यामधे चाचणी घेण्याच्या निमित्ताने का होईना पण आले.त्या कालव्याची कामे सुरू असली तरी तालुक्याच्या हक्काचे पाणी यायला अजून किती दिवस लागतील हे सांगता येत नाही.टेंभू आणि म्हैसाळ योजनेच तालुक्याच्या हक्काचे पाणी आजपर्यंत शेजारच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनीच वापरले.अशा पार्श्वभूमीवर सांगोल्यातील मान नदीकाठावरच्या चिनके पासून मेथवडे पर्यंत कायम पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावातील तरुणांनी संघटित होऊन एक क्रुती समिती तयार केली.
२०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाणी प्रश्न पेटणार होताच.आमदारकीचे सर्वच उमेदवार केवळ दुष्काळ आणि पाणी याच दोन मुद्द्यांवर एकमेकांवर गरळ ओकणार होतेच . वेगवेगळ्या कार्यक्रमांमधुन त्याची सुरुवात देखील झाली होती.पण तत्पूर्वी या १४ गावांतील जनतेने आंदोलनाची गुगली अशी टाकली की सर्वच नेते आणि त्यांच राजकारण बँकफुटवर गेलं आणि जनता फ्रंटफुटवर आली. 
     १)मान नदिवरचे १४ गावातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हक्काच्या टेंभू योजनेच्या पाण्यातून भरून द्यावेत.
२)माण नदिला कालव्याचा दर्जा द्यावा.
३)नीरा उजवा कालव्याची कामे लवकरात लवकर पुर्ण करुन हक्काचे पाणी तालुक्याला मिळावे या आणि अशा आणखी काही मागण्या घेऊन १४ गावच्या जनतेने क्रुती समितीच्या नेतृत्वाखाली सांगोला तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला.या मोर्चाचे फलित म्हणून टेंभू योजनेच्या पाण्याने बंधारे भरण्यासाठी १६ नोव्हेंबर ला पाणी माण नदीपात्रात सोडण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते.पण १६ तारीख उलटून गेली तरी पाणी सोडण्याबाबतीत कुठलीच क्रुती न झाल्याने.१४ गावांतील शेतकऱ्यांनी क्रुती समितीच्या नेतृत्वाखाली जनावरांसह तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलनाला १७ नोव्हेंबरपासुन सुरुवात केली.सोबतच दिपक पवार व दत्ता टापरे या युवकांनी पाणी मेथवडे बंधाऱ्यांमधे पोहोचत नाही तोवर बेमुदत उपोषनाचा निर्णय घेतला.या आंदोनस्थळी तालुक्यातील सर्वच नेतेमंडळीनी भेटी दिल्या पण पाणी येण्यासाठी  त्यांच्याकडून तातडीने जे प्रयत्न होणे गरजेचे होते ते झाले नाहीत.खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी जबाबदारी ओळखुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.मंत्री विजयबापु शिवतारे आणि क्रुती समितीच्या झालेल्या बैठकीत तोडगा काढण्याचे प्रयत्न देखील झाले.उपोषणकर्त्यांच्या तब्येती बिघडल्या.२४० तास म्हणजे १० दिवस उपोषण केल्यानंतर,तळपत्या उनाची आणि रात्रीच्या थंडीची कसलीही तमा न करता शेतकरी आणि जनावरानी तहसिल कार्यालयावर ठीय्या मांडल्यानंतर आणि या आंदोलनात उष्माघाताने एका म्हशीचा बळी गेल्यानंतर या आंदोलनाला यश आले.२७ नोव्हेंबरला टेंभू योजनेचे पाणी मान नदीच्या दिशेने मार्गस्थ झाले.३० नोव्हेंबर ला अनेक अडथळे पार करत हे पाणी सांगोल्यातील चिणके गावामध्ये दाखल झाले.प्रचंड मोठा संघर्ष करून मिळालेल्या या पाण्याला पाहण्यासाठी चिणके येथे क्रुति समितीसह मोठ्या संख्येने लोक आले होते.एका दुष्काळी तालुक्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात पाण्यासाठी झालेले हे आजपर्यंतचे सर्वात प्रभावी, आक्रमक आणि यशस्वी आंदोलन आहे.क्रुती समितीचे नियोजन,शेवटपर्यंत मागण्यांवर ठाम राहण्याचा संयम,एकी,जनावरांसह अद्यापपर्यंत तेथेच बसुन असलेल्या शेतकऱ्यांची सहनशीलता, उपोषणकर्त्यांचा धीर,आणि प्रसारमाध्यमांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेवटपर्यंत दिलेली साथ,अनेकांनी जनावरांसाठी केलेली चारा आणि पाण्याची सोय सगळच कौतुकास्पद होतं.हा संघर्ष सुरू झाल्यापासून त्याला यश मिळेपर्यंतचा या आंदोलनाचा प्रवास थक्क करणारा वाटतो.एकप्रकारे यंदाच्या भीषण दुष्काळनेच शेतकऱ्यांना लढायला बळ दिले अस म्हणायला हरकत नाही. आणि लढण्याची ईच्छा असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एकीच्या वज्रमुठीत सामावून घेण्याची आणि त्यांच्यात चैतन्य निर्माण करण्याची किमया साधली क्रुति समितीच्या तरुण ,तडफदार युवकांनी. सर्वांनी या आंदोलनातील आपलीआपली जबाबदारी ओळखुन अतिशय चोखपणे ती निभावल्यानेच या पक्षविरहीत आंदोलनाला यश मिळाले.या आंदोलनातुन संघर्ष केल्याशिवाय आणि लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या माणगुटिवर बसल्याशिवाय आपली कामे होत नसतात हि अतिशय मोलाची शिकवनदेखील तालुक्याला मिळाली.
     एकीकडे २३ते २६ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत नागपुरमध्ये मध्य भारतातील सर्वात मोठे क्रुषी प्रदर्शन 'अँग्रो व्हिजन' नितीन गडकरीच्या नेतृत्वाखाली पार पडत होते.उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये योगी आदित्यनाथ, केंद्रीय क्रुषीमंत्री राधामोहन सिंह,चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'दुष्काळाशी झगडत देखील सांगोला सर्वच प्रकारच्या फळबागांचा  हॉर्टिकल्चरल झोन होत असल्याची माहिती दिली.' शेततळ्यांच्या माध्यामातुन तालुक्याने केलेल्या सुक्ष्म सिंचन क्रांतीचे कौतुक राज्यभरात होत असते.पण त्याच सांगोल्यातील शेतकऱ्यांना हि फळशेती टिकविण्यासाठी एवढा संघर्ष करावा रागत असेल तोही हक्काच्या पाण्यासाठी तर हि अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.पण या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत शासण आणि प्रशासणाने लक्षात ठेवावे की सांगोल्यातला तरुण शेतकरी खडबडून जागा झालाय.आणि तो आता यापुढे त्यांच्या हक्काचे पाणी कधीच सोडणार नाही.हक्काचे पाणी तो मिळवणारच.सुदैवाने यापुढील काळात पाऊस वेळेत पडावा आणि निसर्गाचा सर्वांगीण समतोल राहावा जेणेकरून कोरडा दुष्काळ पडु नये.शेवटी १४ गावांची क्रुती समिती,समितीतील सर्व तरुण,आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे अभिनंदन आणि आगामी काळासाठी हार्दिक शुभेच्छा.आपली शेती सम्रुद्ध व्हावी.
@अमित जालिंदर शिंदे

Friday, November 16, 2018

ह्या दुष्काळाच नक्की करायचं तरी काय??

           ह्या दुष्काळाच नक्की करायचं तरी काय??
     आज अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे घनदाट ढग गडगडत आहेत. शेतीचा विचार दुरचं,प्यायच्या पाण्याची अवस्थादेखील भयंकर बिकट झाली आहे.मराठवाड्याला वरदायिनी असलेलं जायकवाडी रिकामच राहीलं.ते नगर आणि नाशिकमधल्या पाण्याने भरून घेण्यावरुन अगदी न्यायालयातुन निर्णय घ्यावा लागला.मागील काही वर्षांचा अभ्यास केला तर आपल्याला समजेल की पावसाचे प्रमाण प्रत्येक वर्षी कमीकमीच होतयं.यावर्षी तर महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस कसलाच पडला नाही. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या दुष्काळाची काळीभोर छाया आहे.दुष्काळमुक्तीसाठी जलसंवर्धन गरजेचे आहे हे एक सत्य आहेच पण पाऊसच पडणार नसेल तर कुठल्या पाण्याचे जलसंवर्धन आपण करणार आहोत??याच कारणामुळे कदाचित जलयुक्त शिवार आणि वॉटर कप सारख्या चळवळी होऊनदेखील भुजल पातळीत १ मीटरने घट झालीये.सांगोला-आटपाडी सारख्या तालुक्यांमध्ये १५०० फुट खोल बोअरवेल घेतले तरी नुसता धुरळाच उडताना पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस माणूस निसर्गावर अतिक्रमण करू पाहतोय. आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणावर झाडांच्या कत्तली होत आहेत. वनांच्या घटत्या टक्केवारीमुळेच हवेतील कार्बन डायऑक्साईड वाढतोय. आणि, जागतिक तापमानवाढीसारख्या संकटांचा आपल्याला सामना करावा लागतोय.ढगांतील सुक्ष्म जलकणांचे मोठ्या जलबिंदुत रुपांतर झाल्यानंतर झाल्यानंतर हे जलबिंदु हवेपेक्षा जड होऊन पाऊस पडतो.यासाठी वातावरणात गारवा असणे महत्त्वाचे असते.झाडे तोडली गेल्यामुळे आम्ही मात्र जागतिक तापमानवाढीचा सामना करतोय. कसा पडणार मग पाऊस??
सरकार दरवर्षी कोट्यावधी व्रुक्षलागवडीचा कार्यक्रम महिनाभर धुमधडाक्यात करते पण गरज आहे ती लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची आणि त्यासाठी वर्षभर कोट्यावधी व्रुक्षसंगोपन मोहीम राबविण्याची.'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ही आपल्या सर्वच सरकारी योजनांची ओळख.असो,सरकार काय करतं यापेक्षा आपण सुजाण नागरिक काय करतो हे अधिक महत्त्वाचे आहे.आपण आपली शेती सम्रुद्ध ठेवण्यासाठी ,पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठी स्वतःच आपल्या स्वतःच्या शेताच्या बांधावर,परसबागेमध्ये व्रुक्षलागवड करून त्यांचे संगोपन करणेही गरजेचे आहे.अन्यथा पाण्याविना विनाश फार काही दूर नाही.
     पाण्याच्या तुट निर्माण होण्याला आणि भुजलपातळी खोलावण्याला वाढलेली लोकसंख्या हे देखील महत्त्वाचे कारण आहे.लोकसंख्या वाढली.लोकांच्या गरजा वाढल्या .गरजा भागविण्यासाठी परत व्रुक्षतोड झाली. पाऊस खूप कमी पडू लागला.१९४७ ला भारताची ३० कोटींच्या घरात असलेली लोकसंख्या चारपटीने वाढली तर पावसाचे प्रमाण चारपटीने कमी झाले. पाण्याची गरज भागविण्यासाठी विहिरी,आड आणि शेकडो फुटांच्या बोअरवेल खणल्या गेल्या. वीजेवरच्या इंजिनांच्या साहाय्याने भुगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होत गेला.तुलनेत पाऊस कमीच पडू लागला.त्यामुळे आगामी काळात आपल्या जोशील्या तरुण भारताला व्रुक्षलागवड,व्रुक्षसंगोपन आणि जलसंवर्धनाबरोबरच लोकसंख्या नियंत्रण देखील ठेवावे लागणार आहे.आणि या गोष्टींसाठी शासकीय मोहीमा आणि योजनांपेक्षा लोकचळवळ आणि जाग्रुती होण्याची खरी गरज आहे.
     चला तर मग येणाऱ्या दुष्काळाचा साहसाने सामना करताना निर्धार करुया व्रुक्षलागवडीचा,त्यांच्या संगोपनाचा,जलसंवर्धनाचा आणि लोकसंख्या नियंत्रणाचादेखील...
@अमित जालिंदर शिंदे.

⏺️सांगोल्यातील यंदाच्या दुष्काळाची दाहकता दाखवणारी काही छायाचित्रे
गरीबांची गाय असलेलल्यां शेळ्यांना शेतातून चारा आणि गवत उपलब्ध होत नसल्याने बाभळीच्या शेंगा आणि फांद्या तोडून घालताना शेळीपालक.
-----------------------------------------------------------------------------------------------
पावसाअभावी यंदा ज्वारीचे कोठार असलेल्या सोलापूर जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या पेरण्या झाल्याच नाहीत. पण सांगोल्याच्या काही भागात पावसाच्या आशेने धाडसाने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची ज्वारी पाण्याअभावी सुकून चालली आहे. यंदा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम कोरडेच गेले.
-----------------------------------------------------------------------------------------------
सांगोल्यातील ५० वर्षापूर्वी खोदलेल्या पण अद्याप कोरड्याच असलेल्या नीरा उजवा कालव्याच्या काठावर शेळ्या चरायला सोडल्या जातात.
-----------------------------------------------------------------------------------------------
कधी नव्हे ते जनावरांच्या चाऱ्यासाठी कारखाण्यांच्या एफ.आर.पी.पेक्षा महाग दराने ऊस खरेदी करताना पशुपालक. हे चित्र असेच राहिले आणि शासणाने चाऱ्याची व्यवस्था केली नाही तर जनावरे मोकाट सोडावी लागतील

Friday, November 2, 2018

राजकारण थांबवा

दै.लोकसत्ता, दि-०२/११/१८,शुक्रवार लोकमानस मध्ये प्रसिद्ध झालेला विचार
लिंक-http://epaper.loksatta.com/c/33635871

Wednesday, October 24, 2018

सर्व पक्षांचे हेच तर सुरू...

२४/१०/१८ च्या दै.लोकसत्ता मधील लोकमानस या सदरात आलेली आपली प्रतिक्रिया

Sunday, October 21, 2018

पंढरीची वारी

         पंढरीची वारी-गरिबीच्या स्वप्नांना कष्टाच चांदण

राधाबाई आज निवांत पडल्या होत्या.काही केल्या त्यांचा डोळा उघडत नव्हता.दररोज ह्या वक्ताला शेणघाण काढून,जणावरांना वैरण-पाणी करुन,स्वताच आवरुन,दुपारच्या जेवणाचं गाठोडं बांधून त्या सकवराबाईंची वाट बघत बसलेल्या असायच्या.दोघी मिळून कामावर जायच्या आणि स्वताची घरे चालवायच्या.नवऱ्याच्या अकाली मरणानंतर,ऐन तारुण्यात कपाळ पांढरं झालेल्या राधाबाईंनी गावात मिळेल त्याच्या शेतावर काम करून सुषमाचं शिक्षण पूर्ण केले,लाखभर रुपये हुंडा देऊन चांगला नोकरदार मुलगा शोधून गावाचे डोळे दिपवून टाकेल अस शाही लग्न लावून दीलं.
     सुषमा ही राधाबाईची एकुलती एक मुलगी.आखीव-रेखीव चेहऱ्याची आणि गोऱ्यापान रंगाची सुषमा पहिल्या नजरेतचं कुणाच्याही डोळ्यात भरेल अशीच होती. लहानपणी डेंग्यूच्या तापाने मरणाच्या दारात पोहोचलेल्या सुषमाला राधाबाईने मुंबईच्या मोठ्या दवाखान्यात नेऊन जीवंत केले होते. सुषमाच्या दवाखान्यातील खर्चासाठी तिने शामराव पाटलाकडुन ५००००₹ कर्ज घेतल होतं.हे कर्ज फेडण्यासाठी पुढे वर्षभर राधाबाई पाटलाच्या घरी धुणीभांडी,झाडलोट, धारापाणी,खुरपणी करीत होती.सुषमाला पोटभर जेवायला मिळावं,तिला चांगले कपडे मिळावेत, वह्या-पुस्तकं वेळेत मिळावीत,तिला काही कमी पडू नये म्हणुन राधाबाई स्वतःच्या पोटाला चिमटा काढून,हौसमौज विसरून दररोज सुर्योदयापासुन,सुर्यास्तापर्यंत दुसऱ्यांच्या शेतात खपायची.अगदी गड्यावाणी काम करायची.अभ्यासात हुशार असलेल्या सुषमाचं कौतुक करताना तिचा ऊर भरून यायचा."माझी पोरगी मोठ्ठी सायबीन व्हयलं आणि मला चार चाकाच्या गाडीतनं पंढरीच्या विठुबाकडं न्हील"असा डंका राधाबाई सगळ्या गावात पिटत असे.
     सुषमादेखील शिकून पुण्याला गेली.मोठ्या आय.टी.कंपनीमध्ये मोठ्या पदावर नोकरीला लागली. तिनं मोबाईल घेतला. आईला साधा फोन घेऊन दीला.पण लग्नानंतर जसजसं शहराच वारं तिला लागत गेलं तसतसे तिच्यात बदल होऊ लागले.काबाडकष्ट करून शिकविणाऱ्या आईचा तिला विसर पडू लागला.रोज होणारा फोन आता चुकून आठवण आली की १०-१५ दीवसातुन होऊ लागला.महिन्याभराला होणारी भेट आता सहा-सहा महिने होत नव्हती. पुर्वी आईला खर्चासाठी महीन्याला २०००₹ पाठविणारी सुषमा आता २००₹ देखील वेळेत पाठवत नव्हती .त्यामुळे आख्खं आयुष्य कष्टात घालविलेल्या राधाबाईच्या नशिबी परत दारिद्र्य आलेलं.म्हातारपणी दुबळं शरीर घेऊन आता परत वितभर पोट भरण्यासाठी  कामाच्या शोधात दुसऱ्यांचे बांध पालथे घालण्याची वेळ आली होती. असं नव्हत की सुषमाला कामातुन वेळ मिळत नसेल किंवा शहरात पगार पुरत नव्हता,पण मिळालेला वेळ आणि पगारदेखील सुषमाला फँन्सी कपडे,मेक-अप,खाण्या-पिण्याच्या पार्ट्या,सिनेमे आणि इतर अव्याहत खर्चासाठी पुरत नव्हता.राधाबाईंना असही ऐकायला मिळाल होत की,"आय.टी.कंपनीत काम करुन गलेलठ्ठ पैसा मिळविणारी सुषमा नवऱ्यासोबतच दारुही प्यायला शिकलेली",पण शहरात थोड चालत असेल असा ग्रह करुन भाबड्या राधाबाईंनी मनाची समजूत घातलेली.
     एव्हाना सकवराबाई,राधाबाईंच्या घरी येऊन पोहोचलेल्या. त्या राधाबाईंना हाकारुन उठवत होत्या,पण काही केल्या राधाबाई उठत नव्हत्या.नंतर त्यांनी राधाबाईंना गदागदा हलवून उठविण्याचा देखील प्रयत्न केला पण तरीही त्या उठेनात.सकवराबाईंनी एकच टाहो फोडला.त्यांच्या जीवाभावाची, २० वर्षे कामात साथ देणारी भोळीभाबडी राधा या जगात राहिली नव्हती.ती देवाला प्यारी झाली होती.सकवराने फोडलेला टाहो ऐकून,तिच्या आरडून-ओरडून रडण्याने सगळा गाव आणि राधाबाईची आख्खी पवाराची भावकी गोळा झाली होती. सगळा गाव हळहळत होता.एव्हाना दुपार झालेली,पण सुषमा अजून आली नव्हती.सकाळीच गावकऱ्यांनी तिला निरोप पोहोचवला होता.अंत्यसंस्कारासाठी ताठकळत बसलेल्या गावकऱ्यांचा संयम आता संपत आला होता.म्हणून त्यांनी एकदा सुषमाला शेवटचा फोन करून पाहायचं ठरवलं. शेवटी सरपंच शामराव पाटलांनी पुढाकार घेऊन फोन लावला.नशेत तर्र असलेल्या सुषमाने फोन उचलताच सरपंचांनी विचारले,
"ते नव्हं,सुषमा बाळ,तु कुठवर आली हायस??आम्ही अजून किती वकुत वाट पाहायची??"

सुषमा,"तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या.माझ्या येण्याने काही ती आता जीवंत नाही होणार,आणि माझ्याकडे आता तेवढा वेळ पण नाही." 

सरपंच,"आगं पोरी आस वाईट-वंगाळ नगु बोलुस,आय हाय तुजी ती,तुला तिचा मुखडा शेवटचा एकदा बगु वाटत आसल की गं लेकरा??"

सुषमा,"मला तिचा फोटो व्हाट्स-अँप ला पाठवा की,वेळ मिळाला की पाहून घेईन मी."

सरपंच,"आगं यीडी का खुळी-बिळी झालीस तु,फुटुत तिच त्वांड मस्त बघशील ग पण तिच्या अस्थी पंढरीच्या चंद्रभागेत कोण ग सोडणार बाईई??"

सुषमा,"त्याच तुम्ही मला कुरिअर पाठवा,पुढचं माझ मी बघते,आणि खर्चाचं सांगा मी पैसे पाठवुन देते."
हे ऐकताच तळपायाची आग मस्तकात गेलेल्या शामरावांनी दणकन फोन आदळला.गावकऱ्यांनी राधाबाईंचे अंत्यसंस्कार यथोचित पार पाडले.सकवराचा थोरला ६ वी नापास झालेला लेक सुनीलने राधाबाईंना मुखाग्नी दीला.सुषमाला मात्र काबाडकष्ट करणाऱ्या आईचा विसर पडला.शिक्षित होऊन आय.टी.त काम करताना आणि शहरातल्या आभासी,अस्थायी जीवनाची भुरळ पडलेली सुषमा वास्तव जीवनातील स्थायी नाती विसरून गेली.आय.टी. तल्या यशाने तिला हुरळून घालवलं आणि कदाचित त्यामुळेच मातीशी असलेली नाळ तिने तोडली.शिकलेल्या लेकीच्या गाडीतून पंढरीच्या विठुबाकडं जायचं स्वप्न पाहणाऱ्या राधाबाईचं हे स्वप्न सुनील आणि शामरावांनी पुर्ण केलं ,तिच्या अस्थी विठुबाचरणी चंद्रभागेत अर्पण करुन.
माणुसकी हरवत चाललेल्या समाजात मुलामुलींच्या अशाच सुषमा निर्माण होऊ लागल्या तर कुटुंब व्यवस्था कोलमडून पडेल यात तिळमात्र शंका नाही.
@अमित जालिंदर शिंदे.
टिप-सदर कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक असुन त्यांचा वास्तवाशी काही संबंध नसला तरी त्या सद्यस्थितीवर भाष्य करतात.

Saturday, October 20, 2018

तरवडीच्या माळा

   
PHOTO-BY AMIT SHINDE
     मराठी वर्षाप्रमाने येणाऱ्या सगळ्याच मराठी सणांना साजरा करण्याचा गावकुसातला मराठमोळी थाट वेगळाच असतो.आपल्याच थाटात येणारा आणि नऊ दिवस बायाबापड्यांना कामाला लावणारा नवरात्रीचा उत्सव.हा उत्सव सुरु होतो घटस्थापनेणे आणि संपतो विजयादशमीच्या सीमोल्लंघनाने.आमच्या गावकुसात राहणारा कष्टकरी शेतकरी सीमोल्लंघनाला त्याच्या भाषेत शिलांगण म्हणतो.आमच्या गावी अगदी लहान असल्यापासूनच आज्जीला सालाबादप्रमाणे दरवर्षी घटस्थापना करताना मी पाहात आलोय.घटस्थापना केल्यानंतर विजयादशमीपर्यंत रोज इंचभर वाढणाऱ्या घटांची पुजा घटाला तरवडीच्या फुलांच्या माळा आणि कडाकणी अर्पण करून करतात.आमच्या लहानपणी आम्हा दोस्त कंपनी मध्ये ह्या तरवडीच्या माळा बणविण्याची मोठी स्पर्धा असायची.आम्ही सारी मराठी माध्यमातून शिकणारी बिलंदर पोर-पोरी .इंग्लिश मीडियम ग्रामीण भागात औषधालाही नव्हती त्यावेळी.सकाळी लवकर उठून शाळेला जायच्या आधी तरवडीच्या फुलांच्या माळा बनवून घरी आणुन द्याव्या लागायच्या.वर्षभर ९ वाजेपर्यंत न उठणारे आम्ही नवरात्रीमधे माळांच्या निमित्ताने ६ लाच उठायचो.तळ्यांच्या बांधाला,काळ्याभोर शेतांतील बांधाला,कँनॉलच्या शेजारी,बैलगाडी रस्त्यांच्या दोहोंबाजुला तरवडीची झाडे असायची.भल्या लांब माळा बनवुन घरी नेण्याची आमची स्पर्धा रोज चालायची.आता १०-१५ वर्षातच काळ इतका गतीने धावला की आमचे गावठी जोडीदार दोस्त प्रोफेशनल झाले.आधुनिक शेती आणि डांबरी रस्त्यांच्या मुळे तरवडीची झाडे नामशेष झाली. घटस्थापणेला घटावर लागणाऱ्या लांबलचक माळांची जागा झेंडुची फुले घेऊ लागली.गावाकडचे सण बदलले .ते साजरे करण्याच्या पद्धती बदलल्या.गावांवर शहरांतील इमारतींच्या सावल्या पडायला लागल्या आणि गावातील निस्वार्थी गावकरी गावगाड्यात वैऱ्याप्रमाणे भांडु लागले.
     म्हणुन या धकाधकीच्या जीवनात मनाला कधीतरी वाटत की गड्या आपला गाव भारी होता,तिथली ती भिंती चिरलेली मराठी शाळा बरी होती,शाळेत येणारे शर्टची बटणे खालीवर लावणारे बिलंदर दोस्त भारी होते.त्याना शिकवणारे  मळक्या कपड्याचे अडाणी आई बाबा बरे होते. ती तरवडीची पिवळी फुले, त्यांच्या लांबलचक माळा ,गोड कडाकणी आणि आज्जीचे उपवास बरे होते.त्यानिमित्ताने खिचडी खायला मिळायची.
गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी,
मुले चालली इंग्रजी मीडियमला,फुले मात्र तशीच तरवडीला....

  • @अमित जालिंदर शिंदे

Monday, September 10, 2018

पांडुरंग करो आणि पाऊस पडो...



PHOTO-BY AMIT SHINDE
@AKOLA(WASUD,TAL-SANGOLA
पिढ्यानपिढ्या कोरड्या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सांगोला तालुक्यात सप्टेंबर उजाडला पण अद्याप पावसाचा थेंब पडला नाही.पाण्याअभावी खरीपाच्या पेरण्या झाल्याच नाहीत. काही तुरळक शेतकऱ्यांनी धाडसाने तुरी-बाजरी-मुग-मटकी पेरली पण जमीनीत ओलावाच नसल्याने बी ला अंकुर फुटलेच नाहीत. पावसाळ्यातल्या कडक उन्हाने बोरीचे मोहोर जळुन गेले.यंदा आशा होती डाळिंबाला तरी चांगले दर मिळतील पण यंदाच्या खराब वातावरणामुळे सरसकट डाळिंब बागांमध्ये तेल्या रोगाने शिरकाव केला.अद्याप पाऊसच नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.कांद्याची रोपे तयार आहेत पण लागवडीसाठी पाणीच नसल्याने टँकरने पाणी विकत घेऊन कांदालागवड सुरू आहे.१०००-१२०० फुटांपर्यंत बोअरवेल घेतल्या तरी फक्त धुरळाच उडतो इतकी भुजल पातळी खाली गेली आहे.पाण्याच्या आणि पावसाच्या या भयावह परिस्थितीमुळे सध्या शेतातील पिके तर वाया गेलीच आहेत पण आगामी काळात माणुस आणि जणावरे यांची तहान भागविण्यासाठी सुद्धा पाणी उरणार नाही. पाणीच नसल्याने गुरांना हिरवा चारा देखील मिळायचा बंद झालाय.त्यामुळे सध्या तालुक्यातील दुध उत्पादक शेतकरी हिरव्या चाऱ्यासाठी शेजारच्या पंढरपूर,अकलूज भागातुन ऊसाची खरेदी करतोय.एकिकडे दुधाचे दर मातीमोल झाले असताना दुसरीकडे चाऱ्याचे दर मात्र गगणाला भिडले आहेत.सध्या सांगोल्यातला दुध उत्पादक शेतकरी ३०००₹ प्रतिटन दराने उसाची खरेदी जनावरांच्या चाऱ्यासाठी करतोय. त्याच ऊसाला जिल्ह्यातील साखर कारखाने एफ.आर.पी.सह २५००-२७००₹ प्रतिटनापेक्षा जास्त दर देत नाहीत. जो ऊस कारखानदारांना साखर करायला २७००₹ प्रतिटन घ्यायला परवडत नाही,तोच ऊस सांगोला तालुक्यातला पावसाच्या प्रतीक्षेत पिचलेला आणि पावसाअभावी शेतातील नापिकीने डबघाईला आलेला शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी ३०००₹ प्रतिटन दराने खरेदी करतोय.एवढा महागडा चारा घेऊनदेखील उत्पादित होणाऱ्या दुधाचे दर मात्र स्वताचे पोट भरण्याइतपतदेखील मिळत नाहीत.मुळातच शेतकऱ्यांचा हा खटाटोप उत्पन्न मिळविण्यापेक्षा पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेली जणावरे जगविण्यासाठी चाललाय.आगामी काळात जर पाऊस पडलाच नाही तर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष तर करावाच लागेल पण जनावरे विकण्याची आणि शेती सोडून रोजगारासाठी दुसरे मार्ग शोधण्याची देखील वेळ येऊ शकते.शासणाने यापुढे व्रुक्षलागवडीसोबतच व्रुक्षजतनाकडे लक्ष देऊन पर्यावरणीय समतोल सांभाळुन या गंभीर संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी.
पांडुरंगाच्या आशिर्वादाने पाऊस व्हावेत आणि हे भीषण संकट दुर व्हावे हिच सदिच्छा...
@अमित जालिंदर शिंदे

Sunday, July 29, 2018

सुस्तावलेले अधिकारी थंडावलेली व्यवस्था...

  सुस्तावलेले अधिकारी आणि थंडावलेली व्यवस्था 
यावर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष सण २०१८/१९ साठी  च्या पदव्युत्तर  कृषी पदवीची प्रवेश प्रक्रिया अद्याप म्हणजे दि -२७/०७/२०१८ पर्यंत सुरु झाली नव्हती.मागील वर्षी हि प्रवेश प्रक्रिया दि -१०/०७/२०१७  ला सुरु झाली होती.मागील वर्षी प्रवेश पूर्ण होऊन दि १२/०८/२०१७ ला कॉलेज सुरु झाली होती. २५/०३/२०१८ ला सामाईक परीक्षा होऊनदेखील प्रवेश प्रक्रियेला उशीर  झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आणि यासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे याना कॉल केले असता सकाळी १० तर संध्याकाळी ५ या वेळेत त्यांचा फोन बंद असायचा आणि इतर वेळी मात्र रिंग व्हायची .त्यामुळे दि -२७/०७/२०१८ रोजी मी दैनिक ऍग्रोवन यांचे पुणे जिल्ह्यातील वार्ताहर मा.मनोज कापडे सर यांच्याकडे या संबंधित तक्रार केली.तक्रार केल्यानंतर दि -२८/०७/२०१८ रोजीच्या दैनिक ऍग्रोवन ला प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून म्हणजेच दि -३०/०७/२०१८ पासून राबविण्यात येत असल्याचे विधान शिक्षण संचालक श्री हरिहर कौसडीकर यांनी केल्याचे छापून आले.या संपूर्ण घटनेवरून असेच लक्षात येते कि सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना हलवून जागे केल्याशिवाय थंडावलेली व्यवस्था गतिमान होत नाही.
दि-२८/०७/२०१८ च्या दै.अँग्रोवन मध्ये आलेली बातमी..
या फोटोमध्ये आपण केलेली तक्रार आणि सरांनी दिलेले आश्वासन यांचा उल्लेख आहे.


Wednesday, July 25, 2018

बेंदूर

   
 
     महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा प्रदेश आणि विठ्ठल हा शेतकऱ्यांचा देव.त्यामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्यावर पिकाने माना वर काढल्या कि शेतकरी विठुरायाच्या वारीला जायला रिकामा होतो.जेष्टी पौर्णिमेच्या नंतर सातव्या किंवा आठव्या दिवशी संत तुकाराम महाराज,माउली ज्ञानेश्वर महाराज,आणि सर्व संतसज्जनांच्या पालख्या पंढरीकडे प्रस्थान करतात .उभ्या जगाला पोसणार पोशिंदा बळीराजा देखील या संतसज्जनांच्या सोबतीने सावळया पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन पायी  पंढरीची वाट चालतो.आषाढी एकादशीला हा वारकरी शेतकरी पंढरीत विठ्ठल आणि रखुमाईचं दर्शन घेतो.चंद्रभागेच्या तीर्थामध्ये पुण्याची डुबकी घेतो आणि प्रसन्न मनाने आपल्या घराकडे जातो.वारीच्या या दिवसांमध्ये तो घरदार,संसार सगळं विसरून फक्त विठ्ठलभक्तीत तल्लीन होऊन जातो.कारण २०-२२ दिवसांच्या या प्रवासात घराचा आणि त्याचा संपर्क होतच नाही.कारण काही वर्षांपूर्वीपर्यंत हे मोबाईल नावाचं फ्याड शेतकऱ्याला मिळालंच नव्हतं.वारी म्हणजे सांसारिक आणि कष्टाच्या ताणतणावातून मुक्तीचे अनमोल क्षण असायचे.या वारीमध्ये कुणी लहान नसतो कि कुणी मोठा नसतो.कुणी गरीब नसतो कि कुणी श्रीमंत नसतो.कुणी स्त्री नसते कि कुणी पुरुष नसतो.कुणी स्पृश्य नसतो कि कुणी अस्पृश्य कारण विठुरायाच्या या मांदियाळीत प्रत्येकजण फक्त माउली असतो.हि आषाढी वारी झाली कि घरी जाताच बेंदूर आलेला असतो.आषाढीच्या निमित्ताने धन्याची दिवाळी झालेली असते पण धन्यासाठी काम करणाऱ्या त्याच्या बैलांची,दूध दुभती देणाऱ्या म्हशींची,खत गोमूत्र दूध देणाऱ्या गायीची ,ताजा पैसा मिळवून देणाऱ्या शेळ्यामेंढ्यांची दिवाळी मात्र बेंदरालाच असते.

     घरच्या मुक्या जीवांच्या प्रति क्रुतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मराठी सण आहे. शेतकरी मुक्या जीवांची पूजा करतात. महाराष्ट्रासारख्या शेतीप्रधान राज्यात, व तेथील शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.

     या दिवशी बैलांंचा,गायी-म्हशींचा थाट असतो. त्यांना कामापासून आराम असतो. या दिवशी जनावरांना आवरण्यासाठी चाबुक(आसुड) वापरण्यात येत नाही. बेंदुराच्या आदल्या दिवशी जनावरांना ज्वारीचा खिचडा खायला देण्यात येते. बेंदुराच्या दिवशी त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन त्यांना अंघोळ घालण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. याला 'खांद शेकणे' म्हणतात.यावेळी जनावरांना विशेष करुन बैलांना पाठीवर  नक्षी केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग,  गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. जनावरांची निगा राखणाऱ्या घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.

     या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. गावात निघणाऱ्या मिरवणुकीत आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व हलगीच्या ठोक्यावर बैलांना गावातुन मिरवून आणतात.अलिकडच्या काळात मात्र माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे गावरान गावाकडचे सण साजरे करण्याच्या पद्धतीही बदलत चालल्या आहेत.ग्रामीण भागात देखील नागरी संस्कृती रुजत असल्या कारणाने काही भागात बेंदुर साजरा करणे म्हणजे केवळ ते कर्तव्य पार पाडणे असे झाले आहे.त्यातील मुक्या जणावरांविषयीची आपुलकी कमी झाली आहे.बेंदुर साजरा करण्याची हि आपली संस्कृती जतण करणे गरजेचे आहे तरच ती संस्कृती पुढच्या पिढीला ज्ञात होईल अन्यथा नामशेष होईल.
@अमित जालिंदर शिंदे

Saturday, July 14, 2018

महाराज तुम्ही खुशाल निघा...

     दि-१२ आणि १३ जुलै १६६० चा तो दिवस,हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सुमारे ३०० मावळ्यांनी रक्ताच्या अभिषेकाने घोडखिंडीला पावणखिंड बणविण्याचा दिवस,स्वराज्याच्या रयतेच्या धन्यास वाचविण्यासाठी प्रतिशिवाजी बनुन शत्रूच्या गोटात जाऊन साक्षात म्रुत्यु ला आलिंगन देण्याच्या वीर शिवा काशिद च्या धाडसाच्या अमरत्वाचा दिवस.स्वामीनिष्टा काय असावी याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वीर शिवा काशिद यांचे बलिदान.पुढे पन्हाळगडाचा वेढा...सिद्दी जौहर...२०,००० पायदळ,१५,००० घोडदळ,आधुनिक तोफा आणि मोजक्या बंदुका...शिवा काशिद यांचे बलिदान... महाराज विशाळगडाकडे रवाना...सिद्दी मसुदने केलेला पाठलाग... बाजी प्रभु आणि फुलाजी प्रभु देशपांडे बंधूंचा दैदिप्यमान पराक्रम... घोडखिंडीत निकराची लढाई... महाराज विशाळगडावर... तोफांचे आवाज...३०० मावळ्यांसह बाजी प्रभू चे हौतात्म्य हि शिवइतिहासातील जाज्वल्य घटना तमाम मराठी जनांनाच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाला मुखोद्गत आहेच.आज वीर शिवा काशिद, बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे बंधू आणि ३०० मावळ्यांच्या हौतात्म्याला ३५८ वर्षे पुर्ण झाली.पण या अमर कहाणी तुन आजचा आमचा महाराष्ट्र काय शिकतो हे अधिक महत्त्वाचे आहे कारण महाराजांच्या नावाने नुसतीच घोषणाबाजी करण्यापेक्षा महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या चित्तथरारक इतिहासातुन आम्ही चांगले विचार आत्मसात करणे हिच सर्वात मोठी आदरांजली त्या इतिहासाला आणि महाराजांना असेल यात शंका नाही.सोशल मीडिया वरच्या बेधुंद आणि ध्येयाचे रस्ते चुकलेल्या तरुणाईला शिवा काशिद आणि बाजी प्रभुंचे बलिदान कसे प्रेरणादायक आहे आणि त्यातुन आजच्या तरुणाईने आणि अखंड समाजाने काय शिकावे हेच आज मला एका व्हिडीओ च्या माध्यमातून आपल्याला दाखवायचे आहे.१७ मिनिटांचा हा व्हिडीओ नक्कीच तुमच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणेल आणि आपल्या सर्वांना स्वताच्या ध्येयसाधनेसाठी आत्मबळ मिळवुन देईल अशी मला अपेक्षा आहे. शिववक्ते श्री.विनोद अनंत मेस्त्री यांनी सादर केलेले हे घोडखिंडीच्या पावणखिंड होण्याचे स्फुर्तीदायक कथानक नक्की पाहा आणि हौतात्म्यांना आदरांजली वाहा हिच विनंती🙏🏻🙏🏻🙏🏻
 टीप - या व्हिडीओ सोबत च श्री.विनोद मेस्त्री यांचीच महाराज तुम्ही खुशाल निघा ही कविता मुद्दाम जोडली आहे.


                     महाराज तुम्ही खुशाल निघा,
                     महाराज तुम्ही खुशाल निघा.
  हिंमत काय शत्रुची ही खिंड ओलांडायची जोवर इथं पर्वत                           बनुन तुमचा बाजी उभा,
                     महाराज तुम्ही खुशाल निघा.
      माहितीये मला असं निघण जड जातय राजे तुम्हाला,
   आम्हाला अस सोडून जाणं लागत असेल तुमच्या जीवाला.
        लढण्याच बळ तुम्ही दीलं आणि जगण्याला दीशा,
      तुमच्यासाठी हजारदा मरु तुम्ही स्वराज्यासाठी जगा,
                    महाराज तुम्ही खुशाल निघा.
       कल्पना आहे येतील हजारो घोंघावत वादळापरी,
    हटणार नाही किंचीतही मागे कोसळले बनुन लाट जरी.
       ताकद नाही कशातही हरवण्याची या हिंमतीला,
        निश्चयाची मुळे खोलवर रोवून राहीन मी उभा,
                    महाराज तुम्ही खुशाल निघा.
       विशाळगडावर महाराज बाजींसाठी व्याकुळलेले,
        आले बाजी पालखीमधुनी अंग अंग विखुरलेले.
     म्रुत्युलाही थोपविले त्यांनी दोन प्रहर जिद्दीने झुंजून,
          असंख्य वार झेलून शरीर गेले होते पिंजुन.
       तोफांचा आवाज होता म्रुत्युलाही हायसे वाटले ,
                   गेले बाजी खिंड पावण झाली,
            ३०० मावळ्यांच्या पराक्रमाची शर्थ झाली.
             आसवांना माझ्या मी आवर घालू कसा, 
                  माझा बाजी असा जाईनच कसा.
   अरे अमर झाला आठवेल तो सतत खिंडीच्या तोंडाशी उभा          विनवित मला आकांताने महाराज तुम्ही खुशाल निघा,
                   महाराज तुम्ही खुशाल निघा.
@अमित जालिंदर शिंदे

Tuesday, May 22, 2018

क्रिडामंत्र्यांचा नवा अध्याय

                  
                    क्रीडामंत्र्यांचा नवा अध्याय
          आज भारताचे क्रीडा आणि महिती प्रसारण मंत्री मा.राजवर्धन सिंग राठोड यांनी आज त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय.हा व्हिडिओ आजच्या तरुणांना शारीरिक फिटनेस चे महत्व सांगणारा आहे.यामध्ये स्वतः मंत्रीमहोदय भारतीय तरुणांना भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचे समर्पक उदाहरण देऊन फिटनेस संबंधी प्रेरित तर करीत आहेतच पण स्वतःच्या केबिन मध्ये ते पुश अप्स देखील करून दाखवीत आहेत.आजकालच्या महिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगामध्ये एकीकडे तरुणाईच्या बळावर भारताला महासत्ता बनविण्याची स्वप्ने स्वतः पंतप्रधान पाहत असताना भारतीय तरुणाई मात्र त्याच आधुनिकीकरणाची आणि तंत्रज्ञानाची बळी पडुन शारीरिक दृष्ट्या क्षीण होत चाललेली दिसते.आणि याचाच परिणाम तरुणाईच्या कामाच्या क्षमता कमी होण्याच्या रूपामध्ये दिसून येत आहे.आज स्वतः भारताचे पंतप्रधान आणि त्यांचे काही सहकारी दिवसाचे जवळपास १७-१८ तास काम करीत असल्याची उदाहरने आम्ही रोज ऐकत असतो,पण भारतीय तरुण मात्र शारीरिक अस्वास्थ्यामुळे कामाकडे पाठ फिरविताना आणि टाळाटाळ करताना आम्ही पाहतो.त्यामुळे भारताला महासत्ता बनवायचे असेल तर आमची तरुणाई अगोदर मजबूत बनविली पाहिजे.फिटनेस चे महत्व तरुणांच्या मनावर बिंबवलं पाहिजे आणि त्यांना प्रेरित केलं पाहिजे.आणि ही प्रेरणा देण्याचे काम स्वतः क्रीडा खात्याचे मंत्री असलेल्या राजवर्धन सिंग राठोड यांनी सुरू केलेल आहे.त्या व्हिडिओ मध्ये स्वतः मंत्री महोदय किती तंदुरुस्त आहेत हेदेखील आपण पाहू शकतो.                राजवर्धन सिंग राठोड स्वतः हे क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेले बहुधा पहिलेच क्रीडामंत्री असावेत आणि म्हणूनच आजवर भारताच्या कुठल्याच क्रीडामंत्र्यांना शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व वाटले नसावे पण ते राजवर्धन सिंग राठोड याना पटले आहे.त्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन!!!
         राठोड सरांच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन मी आज संकल्प करतो आणि आपण माझ्या सर्व वाचक तरुण मित्र मैत्रिणींना विनंती करितो की आपण देखील दररोज किमान अर्धा तास व्यायाम करून स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष देऊया आणि एका मजबूत तरुण महासत्ता भारताची पायाभरणी करूया.
धन्यवाद!!
                      अमित जालिंदर शिंदे

Wednesday, May 9, 2018

बापू

                                           बापू
फोटोमध्ये डावीकडून तात्या,महेश शिंदे(बापूंंचे चिरंजीव) आणि बापू गप्पा मारत आहेत.

          यांच नाव गोविंदराव शिंदे,पण त्यांना सगळा गाव बापू म्हणुनच ओळखतो.हे आमच्याच शिंदेवस्तीचे.पण एल.आय.सी. या विमा कंपणीमध्ये असलेल्या नोकरीच्या निमित्ताने ते पंढरपुरलाच स्थायीक झालेत.गावात यांची भरपुर मोठी शेती होती,अजुनही आहे.शेतामध्ये आंबा,नारळ,चिकु,सिताफळ,डाळींब अशा फळबागा होत्या.ह्यांच्या शेतातली अजुन एक गोष्ट प्रसिध्द असायची ती म्हणजे हुरड्याची ज्वारी कारण मित्र कंपणी सोबत घेऊन सर्वाधिक हुरडा पार्ट्या करणारा गावातला हा एकमेव इसम.हे            बापु आणि माझे आजोबा तात्या हे एकाच वयाचे आणि त्यामुळेच कदाचित एकमेकांचे अतिशय जवळचे मित्र.
बापू जेव्हा जेव्हा शेतात चक्कर मारायला म्हणुन पंढरपूर हुन गावी  येतात त्या प्रत्येक वेळी तात्यांना भेटायच्या निमित्ताने ते घरी येतातच.यावेळीही श्री. सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेच्या निमित्ताने बापू गावी आले आणि लगोलग तात्यांना भेटायला घरीही आले.
          मी बापुंना तब्बल ४ वर्षानंतर पाहात होतो.त्यांचा चेहरा आणि एकुनच त्वचा सुरकुतलेली होती.देहयष्टी कमरेतून थोडीशी समोरच्या बाजुला झुकलेली.हातांमधली ताकद कमी झालेली आणि बोलताना थोडासा थकवा वाटायचा.आज वयाच्या ८५ व्या वर्षी तात्या आणि बापु दोघांची शारिरीक अवस्था एकसारखीच आहे हे मला जाणवलं.आणि मला नकळत माझ बालपण आठवायला लागल.कुठलीही नोकरी कर भले कंडाक्टर हो पण सरकारी नोकरी कर अस तात्यांच नेहमीच सांगण असतं अगदी मला कळतदेखील नव्हत तेव्हापासून. वडीलांव्यतीरीक्त आमचं भावंडांच शाळेच प्रगतीपुस्तक पाहणारी बापू ही एकमेव व्यक्ति. मी अगदी ५-६ वीला असल्यापासुन बापू मला करियर मार्गदर्शन करायचे.एवढेच नव्हे तर माझं हस्ताक्षर सुधारण्यासाठी मराठी आणि इंग्रजी अक्षरे गिरवायच्या प्लास्टिकच्या पाट्या मला बापुंनीच दिल्या होत्या.म्हणुनच आज माझ्या हस्ताक्षराला सगळीकडे प्रशंसा मिळते.आज समाजात निर्व्याजपणे गरजवंताला मार्गदर्शन करणारे बापू अतिशय नगण्य आहेत.पण तरीदेखील जोपर्यंत अशी थोडीफार माणसे समाजात आहेत,तोपर्यंत समाजातील तरुणांवर चांगले शैक्षणिक संस्कार होत राहतील यात शंकाच नाही.
@अमित जालिंदर शिंदे

Sunday, March 4, 2018

जलसंवर्धनाचे गर्भसंस्कार

                       जलसंवर्धनाचे गर्भसंस्कार
               
 
दुष्काळ
विदर्भ - मराठवाडा - प. महाराष्ट्र...भयाण माळरान...जिथं फक्त कुसळांचीच पिवळीधम्म शेती... उघडे बोडके उन्हाची सोनेरी झालर पांघरलेले टेकडीवजा डोंगर...मधूनच माना वर काढलेली चिलार- बाभळीची काटेरी झाडे... पाण्यासाठी आसुसलेली आणि बेभानपणे भटकंती करणारी गाई-गुरे- वासरे... मैलो न मैल पाण्यासाठी घडे - घागरी घेऊन चाललेली गावकरी बाई माणसांची पायपीट...आणि बरेच काही... ही परिस्थिती महाराष्ट्रात दरवर्षीच एप्रिल - मे मध्ये न सांगता उद्भवते.आता त्याला एका वाक्प्रचाराची जोड मिळाली आहे, "दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे".पण या दुष्काळावर मात करावी,पाण्याची बचत करावी,झाडे लावावी,पाणी अडवून जिरवाव या गोष्टींसाठी आमचा सदा न कदा होरपळलेला माणूस कधी तयारच झाला नाही.म्हणून जलसंवर्धन  करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जलयुक्त शिवार मोहीम राबवली तर दुसरीकडे आमिर खानने  पाणी फाऊंडेशन ची स्थापना करून वॉटर कप स्पर्धेला सुरुवात केली.या स्पर्धेसाठी पाणी फाऊंडेशन स्वतः अगोदर गावकऱ्यांना चांगल्या कामासाठी  ट्रेनिंग देतं आणि नंतर आपल्या कामाची छाप निसर्गावर पाडून जल युक्त आणि दुष्काळमुक्त झालेल्या गावांना कोट्यवधी रुपयांची बक्षिसे देखील दिली जातात. जलयुक्त शिवार योजना आणि वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक गावे आज कायमस्वरूपी दुष्काळमुक्त झाली आहेत.दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी वॉटर कप स्पर्धा २०१८ धूमधडाक्यात आणि नेहमीच्याच उत्साहात सुरू होणार आहे.या स्पर्धेच्या ट्रेनिंग चा कार्यक्रम महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर तज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.यावर्षी एका ट्रेनिंग केंद्रांवर उमरखेड तालुक्यातील सोनधाबी गावातील अनिता साबळे नावाच्या व्यक्ती ट्रेनिंग घेत होत्या.अनिताताई ७ महिन्यांच्या गर्भवती आहेत.आणि आपल्या पोटात वाढणाऱ्या अभिमन्यू वर त्या द्रोपदिप्रमाने दुष्काळाचे चक्रव्यूह तोडण्याचे जणू गर्भसंस्कार च करत आहेत. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या अशी नुसतीच आरोळी ठोकणाऱ्या आणि शिवाजी महाराज जन्माला यावेत तेही शेजाऱ्याच्या घरात या वृत्तीने जगणाऱ्या आजच्या समाजात अनिता साबळे यांच्यासारख्या जिजाऊ जन्माला आल्यात हीच एक जमेची बाब म्हणावी लागेल.यानंतरच्या काळात देखील त्यांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन महाराष्ट्राच्या मातीत अश्या असंख्य जिजाऊ आईसाहेब जन्माला येतील.आणि समाजातील अनेक अनिष्ट गोष्टींच्या विरोधात लढण्यासाठी स्वतः जोमाने कामाला लागतील.आत्मनिर्भर होतील.लढवैया शिवाजी महाराजांच्या विचारांना जन्माला घालतील यात अनिता ताईंकडे पाहिलं की शंकाच उरत नाही.
अनिता साबळे ताईंच्या कामाला अनंत शुभेच्छा. त्यांचा गाव पाण्याने जल युक्त होवो.आणि माणसांमध्ये स्पर्धेच्या निमित्ताने आपुलकीचा ओलावा येवो हीच परमेश्र्वराकडे आपण सर्वजण मनोमन प्रार्थना करू.आणि आपणही पुढच्या काळात समाजकार्यासाठी कुठल्याही परिस्थितीत स्वतःला झोकून देऊ हाच संकल्प यानिमित्ताने करूयात.
@अमित जालिंदर शिंदे

Sunday, February 18, 2018

मी कुणबी बोलतोय

                         मी कुणबी बोलतोय...
आज शेतकरी चोहोकडूंन मरतोय,
कधी दुष्काळाने करपतोय तर कधी गारपिटीने गारठतोय,
हाती आलेल्या पिकांवर निसर्गच अतिवृष्टीचा नांगर फिरवतोय,
मी या साऱ्या आस्मानी संकटांचा नरबळी बोलतोय,
होय तरीही न डगमगणारा मी कणखर कुणबी बोलतोय.

आस्मानाशी लढता लढता सुल्तानाशीही लढतोय,
विकासाच्या समृद्धीतल्या काळ्या आईच्या मोबदल्यासाठी मी झगडतोय,
सहन न होणाऱ्या लाचारीसाठी मी कधी मंत्रालयात विषही पितोय,
होय मी या पाशवी व्यवस्थेचा नरबळी बोलतोय,
मी या व्यवस्थेशी लढणारा लढवय्या कुणबी बोलतोय.

ऊसाच्या दरांसाठी कधी मी रस्त्यावर येतोय,
तुरी आणि सोयाबीन मधे सरकारी राक्षसच मला फसवतोय,
कापसातला बीटी मला बोंडअळीत तसाच दीसतोय,
या साऱ्यांच्या खर्चापायी अनुदानासाठी सरकारपुढे हात पसरतोय,
जगाला पोसुनदेखील मीच लाचार होतोय,
होय मी स्वाभीमानासाठी धडपडणारा कुणबी बोलतोय.

मी संकटे झेलतोय,
परत मातीत बिया टाकून शेतीचा सट्टा लावतोय,
कष्टाच्या घामाने नशिब आजमावतोय,
होय मी हार न मानता परत उभा राहणारा जिद्दी कुणबी बोलतोय.
@अमित जालिंदर शिंदे

Wednesday, February 7, 2018

शेतकऱ्याची आशावादी प्रतिमा.


सर्वसाधारणपणे शेतकरी म्हणलं की डोळ्यांसमोर एक चित्र उभा राहतं.आजच्या रंगीत दूनियेतदेखील हे चित्र ब्लॅक अँड व्हाइट च दिसतं.शेतकरी म्हणल की डोळ्यासमोर येते ती वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसलेली,पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसलेली,भेगाळलेली काळीभोर जमीन;त्या जमिनीमध्ये उंचच उंच वाळलेल्या चिलार- बाभळी आणि काटेरी झुडुपे;त्या झुडूपांच्या आडोश्याला अनवाणी पायाने बसलेला,सडपातळ बांध्याचा काळ्याकभिन्न देहाचा आणि पावसाची वाट पाहात आकाशाकडे पाहणारा एक सुरकुतल्या चेहऱ्याचा जीव.पण या प्रतिमेला छेद देणारा एक फोटो सध्या इंस्टाग्राम वर प्रचंड व्हायरल होतोय.आदित्य गुंड नावाच्या तरुणाने इंस्टाग्राम वर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये एक ८-१० वर्षे वयाचा शेतकरी आपल्या नजरेस पडतो.आदित्य ने टिपलेल्या शेतकऱ्याच्या या प्रतीमेमध्ये दुष्काळाचा,शेताला पडलेल्या भेगांचा, नापिकीचा,कर्जबाजारीपणाचा लवलेशदेखील नाही.ह्या प्रतीमेतला शेतकरी कसल्याच निराशेच्या गर्तेत अडकलेला दिसतं नाही,यासाऱ्याच्या उलट शेतीची गोडी लागलेला हा शाळकरी पोरं उद्याच्या कृषिप्रधान भारताच्या समृद्ध शेतीच प्रतिकच मानावा लागेल.यांच्यासारख्या असंख्य सुशिक्षित शेतकऱ्यांची आज भारतीय शेतीला निश्चितपणे गरज आहे.कारण आजचा शेतकरी आत्महत्या शेती पिकली नाही म्हणून करत नाही तर पिकलेल योग्य दरात विकल नाही म्हणून करतो.आणि पिकलेले कसं योग्य दरात विकायचं याचं शहाणपण शेतीच वेड असल्याशिवाय आणि ग्राहकांचं मन ओळखल्याशिवाय येत नाही.हे शहाणपण या चिमुरड्याला नक्कीच आल असेल कारण या चिमुरड्याच्या डोळ्यात शेतीच्या बळावर जग जिंकण्याचा ,आणि शेती समृद्ध करण्याचा आशावाद निर्भेळपणे दिसतोच आहे.तो आशावाद ना लपवला जाऊ शकतो ना तो पाहणाऱ्याच्या दृष्टीआड होऊ शकतो.शेतीची आणि शेतकऱ्याची ही आशावादी प्रतिमा अशीच टिकून राहिली तर नक्कीच उद्याच्या शेतीला चांगले दिवस येतील यात शंका नाही.
@अमित जालिंदर शिंदे

Tuesday, January 30, 2018

म्हणुनच की काय मला सकाळची शाळा खूप आवडायची

म्हणुनच की काय मला सकाळची शाळा खूप आवडायची
आमच्या भाषेत सकाळची,आज्जीच्या भाषेत बेस्तुर वार ची एकपारगी शाळा असायची,
उशिरा उठल्यामुळे माझी ग्रहापाठाची वही रिकामीच असायची,
शाळेला जाताना सकाळच्या प्रहरी थंडी जरा जास्तच असायची,
तेव्हा मास्तरांची छडी जरा जास्तच लागायची,
शाळा लवकर सुटायची,
तेव्हा आज्जी नेमाने बेस्तूर वार चा उपास करायची,
त्यामुळे दुपारी शाबुची खिचडी खायला मिळायची,
 म्हणूनच की काय मला सकाळची शाळा खूपच आवडायची.
घरी आल्यावर मित्रांची लपाछपी, सुरपारंब्या खेळायची तयारी असायची,
आमच्या आजोबांची मात्र आम्हाला न्हाव्याकडे हजामतीला न्यायची घाई असायची,
तिकडे आज्जीची आजोबांकडे बाजारात विकायला अंडी द्यायची घाई असायची,
हजामती नंतर आम्हाला बाजारातील भजी खायला मिळायची,
आणि म्हणूनच की काय मला सकाळची शाळा खूपच आवडायची.
घरी आल्यावर आई घासून अंघोळ घालायची,
आठवड्याभराची दुर्गंधी क्षणात दुर व्हायची,
तोवर सांज झालेली असायची,
सगळीकडे दिवेलागणीची तयारी सुरु असायची आणि आई अभ्यास करा म्हणून पाठी लागायची,
आम्ही भावंडांनी लागलीच अभ्यासाची नाटकी करायची,
निष्कारण पेन्सिल- खोडरबर साठी भांडण करायची,
तोवर पप्पांची एन्ट्री व्हायची,
आम्ही लगेच वाह्यापुस्टके हातात घ्यायची,
पोरं अभ्यास करताना पाहून पप्पांनी चॉकलेट द्यायची
आणि म्हणूनच की काय मला सकाळची शाळा खूपच आवडायची .
@अमित जालिंदर शिंदे

Tuesday, January 23, 2018

आठवणींचे पत्र...



     संस्कृती ही अशीच आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असते आणि हा वसा आपल्या माय मराठी मातीचा आपण पुढच्या पिढीला द्यायचा..तोच आपल्या मनात दरवळणारा ओल्या मातीचा सुगंध म्हणजे हा मृद्गंध’ आपला हाच संस्कृतीचा वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी, आपल्या मनातील मृद्गंध आपल्या वारसांना पोहोचविण्यासाठी कला  हे माध्यम म्हणून काम करीत असतात.असाच ६४ कला आणि १४ विद्यांचा संगम असलेला,मातीतच जन्मलेल्या शेतकरी भुमिपुत्रांनी आपल्या कलाविष्कारांनी साकारलेला, संगीत,गायण,वादन,नाट्य,नृत्य, आणि सर्वप्रिय अशा शेलापागोट्यांच्या फुलपाकळ्यांनी सजलेला,बहरलेला आजचा हा दीमाखदार सोहळा म्हणजे मृद्गंध २०१८,या मृद्गंध च्या निमित्ताने आपल्या सर्वांना म्हणजेच AGRICOS-2014 BATCH ला उद्देशून                                                                   
प्रिय मित्र मैत्रिणींनो
नमस्कार🙏🏻,
      दि-१९/०८/२०१४;आपण सर्वांनी प्रथम वर्ष कृषि पदवीच्या वर्गामध्ये प्रवेश केला.याचक्षणी आपल्यापैकी काही जणांची कृषिला प्रवेश घेण्याची स्वप्ने पूर्ण झाली,तर काहीजण स्वतःची इंजिनीरिंग आणि मेडीकल ची भंगलेली स्वप्ने भूतकाळाच्या गाभाऱ्यात सोडून नवीन ऊर्जेने शेतकरी, अधिकारी,शास्त्रज्ञ होण्यासाठी बी.एस.सी.(ऍग्री) च्या उंबरठ्यावर आलो.या महाविद्यालयातील १२० जणांची आपली पहिलीच बॅच होती.आपण नियमित कॉलेजला येऊ लागलो.नंतर ही नियमितता अवघड-अवघड कॉन्सेप्ट न समजण्याने कमी झाली.ते सॉईल, बायोटेक,पॅथ कधी समजलच नाही ओ;आणि बाकीचे अॅग्रो,हॉर्ट,जे सोप्प होत ते लक्षात कधी राहीलच नाही.ह्या काळात काहीजणांना ह्या वातावरणाशी जुळवून घ्यायला,घरापासून दुर राहायची सवय व्हायला थोडा वेळ लागला.तितक्यात नोटिस बोर्डांच्या काचा मयुरपंख, स्पोर्टस्,आणि अविष्कारच्या नोटीसांनी चमकू लागल्या.आपल्या बॅचनेही या स्पर्धांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला.पहिल्या वर्षी विशेष गुणवत्ता कुणालाही मिळाली नसली तरी सहभागाचा तो प्रतिसाद दापोलीला आवाज चढवून सांगत होता, "अगले साल आयेंगे तो चॅम्पियन बनके जायेंगे". त्या पराभवातूनच पुढच्या वर्षीच्या विजयाच्या तयारीसाठी १२ हत्तींच बळ मिळालं होत;आणि म्हणूनच की काय दुसऱ्या वर्षी आपण तब्बल ५ बक्षिसे मयुरपंख आणि तितकीच अॅथलेटीक्समध्ये मिळवुन विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळविला.दुसऱ्या बाजूला पहिल्याच सत्र परीक्षेला एक्स्टर्णल म्हणून आलेल्या पागरकर सरांनी "MAKE A SINGLE FOLD" म्हणत म्हणत घामचं फोडला की राव.त्यानंतर झालेल्या पहिल्या वर्षातील पहिल्याच महाविद्यालयीन गॅदरींग,स्पोर्टस् मधील आपल्या क्लास मधील जिगरबाज खेळाडू आणि कलाकारांच्या डोळे दिपवणाऱ्या कामगिरीने आपलाच डंका वाजवला.फर्स्ट इअर चा अपवाद वगळता सलग ३ वर्षे आपण निर्विवादपणे जनरल चॅम्पियनशिप वर दिमाखात राज्य करतोय.
          आपल्या अनेक आठवणी चिरकाल टिकणाऱ्या आहेत.दुसऱ्या सत्रात राणेकाकांना  फसवुन फोंड्याची एंट्री करून घोणसरी डॅमला दिलेली व्हिजीट, हॉस्टेलच्या पाठीमागच्या खाणीमध्ये मनमुरादपणे घेतलेल्या डुंबण्याच्या आठवणी,पाठीमागच्या टेकड्यांमध्ये करवंदाची जाळी शोधता शोधता कोंडये-करंजे पर्यंतची बेभानपणे केलेली पायपीट ,एरवी एकमेकांशी कमीच बोलणाऱ्या आपण मेसमध्ये मात्र एकमेकांना मुद्दाम हाका मारायचो आणि उगीचच सरावलेल्या पुढाऱ्यांप्रमाणे म्हणायचं नमस्कार आमदार साहेब वगैरे, वगैरे...
        आबांच्या हातून काही पडूनच बघावं आणि या संधीचा फायदा घेऊन आपण बेभानपणे फोड फोड म्हणून ओरडाव हे एक समीकरणच झालेलं होतं.इतकंच नव्हे तर राहुलदादा पुंगावकरांच उगीचच मोठ्ठं बोलणं, राहुलदादा कणवाडेंच नेहमीच कन्फ्युज राहणं,ओंकार कुंजीरच उगीचच राक्षसी हसणं, अमरचं दात न दाखवताच हसणं,अमित जोके,गणेश चव्हाण यांचं क्षणार्धात गोळवणकर सरांच्या कॅरॅक्टर मध्ये घुसनं,सप्रे बंधुंच नेहमीच जगापासून अलिप्त राहणं,शुभम ढाणेच लगेच शास्त्रज्ञ होणं आणि आमच्यासारख्या सामान्यांच्या डोक्यावरून जाईल असं काहीतरी निष्फळ बडबडणे,किशोर च पेडनेकर सरांना घाबरून नेहमीच बाथरूम मध्ये पळण,तर विश्रांतीच्या सगळीचं लेक्चर करण्याच्या सवयीने सगळ्यांनाच येणार डोईजड टेंशन,अमृता भगत आणि माधुरी केंगरे च नेहमीच पेपर सुरू होईपर्यंत वाचत बसणं.ह्या साऱ्या आठवणींनी आज जरी गालांवर स्मितहास्य येत असलं तरी त्यावेळी हेच गाल फुगून टम्म व्हायचे.
       नुसत्या चांगल्याच नव्हे तर काही वाईट आठवणी देखील आपल्यासोबत आहेतच.त्यातली म.गांधी जयंती आपण विसरण कसं शक्य आहे.याचदिवशी झालं होत ना आपलं दोन विंगमधल महाभारत.या महाभारताचे पडसाद तर पुढे वर्षभर शीतयुद्धाच्या रूपाने वेगवेगळ्या कारणांनी पडायचे.त्याकाळात तर फक्त संचारबंदीच लागायची राहिली होती;पण पुढे हरकुळच्या त्या मंतरलेल्या NSS कॅम्प मध्ये इना च्या कोला साँग ला हरकुळ गीत करून बेधुंद नाचलो,त्या कॅम्प मध्ये गोळवणकर सरांनी केलेली ती लावणी,अनुसे सरांनी तापविलेल पाणी आणि आपण रात्रभर काढलेले आवाज प्रयत्न करूनही विसरत नाहीत आणि याच सुंदर दिवसांनी आपल्यातलं शीतयुद्ध शमण्याची बीजे रुजली.आज आपल्या या एकीचा,शांततेचा,विशाल वृक्ष झालाय.
          आपल्या १२० जणांमध्ये काहीजण वाढले काहीजण कमीही झाले पण शिवराज,शिवानी सारखे कलाकार;संदेश, शिवम,रोहन, अर्जुन, श्वेता ,गौरी सारखे खेळाडू;प्रदीप,चरण,प्रियांका,स्नेहल,सारखे टॉपर; सुरज सारखा ऑल राऊंडर;सुहेल,संग्राम सारखे नेते;अमोल बाबर,सागर साळुंके सारखे विचारवंत आणि सोबतच काही दंगेखोर,प्रेमवेडेदेखील होतेच,आपल्या या सगळ्यांच्या सोबत असण्यानेच आपली ४ वर्षे परिपूर्ण होती.यानंतरच्या काळात आपण जेव्हा या विस्तीर्ण समुद्रारुपी स्वातंत्र्यातुन जबाबदारीच्या घागरीत भरले जाऊ तेव्हा या आपल्या सर्वांच्या सोबतीच्या आठवणींनी आपल्या डोळ्यांमध्ये ओसांडलेल्या घागरीप्रमाने नक्कीच अश्रु ओघळतील.या जगात गांधींसारखी मवाळ आणि हिटलर सारखी जहाल माणसेच फक्त अमर होतात बाकीचे कालौघात कालवश होतात.आपण त्या हिटलरप्रमाने जहाल कधीच होऊ शकणार नाही पण गांधींप्रमाने मवाळ होऊन आपल्यातले मतभेद विसरून शेवटच्या या दिवसांमध्ये पुन्हा एक होऊयात.तेवढीच सुखाच्या ४ क्षणांची चव आयुष्याच्या शिदोरीला बांधता तरी येईल.आणि हो आपण इथून कायमचं नाही जायचं,आपण परत इथे यायचाय,याच व्यासपीठावर यायचय,समाजात स्वतःची कर्तृत्व सिद्ध करून मराठे साहेबांच्या हातून सत्कार स्वीकारण्यासाठी इथ यायचाय.
       सर्वांना भावी आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा💐💐
शतायुषी व्हा!!💐कीर्तिवंत व्हा!!💐💐
                                                                                                            आपला मित्र                                                          अमित जालिंदर शिंदे


ता.क.-मी आपल्या सर्वांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात कमी शब्दांमध्ये जास्त गाभार्थ घेण्याच्या माझ्या प्रयत्नांमुळे मी आपल्या सर्वांच्या नावाचा उल्लेख करु शकलेलो नाही आणि जर माझ्या या लिखाणातून कुणाला माणसिक ठेस पोहोचली असेल तर  मनस्वी क्षमा असावी...

Friday, January 12, 2018

लोकशाही

स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतरदेखील मतांसाठी लावला जातो गुलाल-भंडारा आमच्या माथी,
मटनाचा अर्धवट शिजलेला तुकडा आणि रश्शाच पाणी पिऊन नेत्यांसाठी कार्यकर्ते जागतात काळ्याकुट्ट राती,
नसलेलं अवास्तव प्रेम दाखवुन आणि अस्मितांची भाषणे करून भडकवल्या जातात जाती,
असुरक्षित मतांच्या व्यवहारासाठी ओतली जातात पैशाची पोती,
या साऱ्या गोंधळात होत नाही चांगल्या उमेदवारांची स्वीकृती,
निवडुन येतात त्याच शाही अपवृत्ती,
म्हणुन प्रश्र्न पडतो; हा देश प्रामाणिक प्रचाराचा की जाती,आमीषे आणि पैसासंपत्तीच्या प्रसाराचा??
हा देश लोकशाहीचा की शाही लोकांचा??
@अमित जालिंदर शिंदे

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...