Monday, July 29, 2019

आठवणीतले जे.आर.डी.टाटा

आठवणीतले जे.आर.डी.टाटा


     JRD TATA म्हणजेच जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा,एअर इंडियाचे जनक आणि वैमानिक होण्याचा परवाना मिळविणारे पहिले भारतीय वैमानिक, जगद्-विख्यात उद्योगपती.जर मनात आणल असत तर कधीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले असते.पण त्यांना व्यवसाय पैसे कमविण्यासाठी नव्हे तर जगाला कमी पैशात दर्जेदार सेवा पुरविण्यासाठी करायचा होता.इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणाऱ्या सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खुप प्रभावित झाले होते.त्यामुळे त्यांनीही वैमानिक होण्याचा ध्यास घेतला.सर जमशेदजी टाटांनी उभारलेल्या टाटा उद्योग समुहाचे चेअरमन म्हणून त्यांची वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी निवड झाली.त्यांनी त्या वयातदेखील १४ कंपन्या असलेल्या टाटा उद्योग समुहाच्या चेअरमनपदाची जबाबदारी लिलया पेलली आणि पुढची तब्बल ५३ वर्षे टाटा उद्योग समुहाच्या विकासाची विमाणे अशी चालवली की आज भारताच्या अवघ्या उद्योग विश्वाचे अवकाश या विमाणांनी व्यापून टाकले आहे.जेआरडी टाटांच्या काळात टाटा उद्योग समुहामध्ये ९१ नव्या कंपन्यांची भर पडली.
     आपण व्यावसायिक आहोत आणि आपण फक्त व्यवसाय करायला हवा या संकुचित विचाराने कधीही त्यांच्या मनाला शिवले नाही. आणि म्हणूनच सामाजिक भाण म्हणून जेआरडी टाटांनी भारतात मुलभूत संशोधन होऊन सर्वसामान्य माणसांचे जीवन सुखकर व्हावे या हेतूने टाटा समाजविज्ञान संस्था(१९३६) आणि टाटा मूलभूत संशोधन संस्था(१९४५) स्थापन केल्या.इतकेच नव्हे तर आशिया खंडातील पहिले कर्करोग रुग्णालय त्यांनी मुंबई येथे सुरु करुन रुग्णसेवेला देखील प्राधान्य दिले.
     जेष्ट समाजसेविका आणि प्रसिद्ध लेखिका सुधाताई मुर्ती जेआरडी टाटांची एक आठवण सांगतात.एकदा जेआरडी टाटा चेअरमन असलेल्या टाटा उद्योग समुहाच्या टेल्को या कंपनीला ट्रेनी इंजिनिअर्स हवे होते.तशी जाहिरात टेल्को ने वर्तमानपत्रामधे दिली होती. ती जाहिरात सुधाताईंनी पाहिली.सुधाताई जाहिरातीतील पात्रतेच्या सर्व अटी पुर्ण करु शकत होत्या पण जाहिरातीच्या शेवटी एक वाक्य लिहिले होते,"महिलांनी या नोकरीसाठी अर्ज करू नयेत." पात्र असतानादेखील केवळ आपण महिला आहोत म्हणून आपल्याला नोकरी मिळत नाही हि गोष्ट सुधाताईंच्या मनाला पटत नव्हती. सुधाताईंनी लगेचच जेआरडी टाटांना एक पत्र लिहिले.
 "आदरणीय सर,
     टाटा हे नेहमीच बदलांचे आद्यप्रवर्तक राहिले आहेत.त्यांनीच भारतात पहिल्यांदा पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या उद्योगांची सुरुवात केली.आज टाटा सर्वच क्षेत्रात काम करतात.टाटांनी भारतात ई.स. १९०० पासून उच्च शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत आणि भारतात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स सुरु करण्यामध्ये टाटांची मुख्य भुमिका होती.आणि योगायोगाने मी त्यामध्येच शिक्षण घेतले आहे.पण मला आश्चर्य वाटतयं कि टाटा चालवित असलेल्या टेल्को सारख्या कंपनीमधे नोकरीसाठी लिंगभेद कसा असु शकतो??".


       सुधाताईंनी लिहिलेले हे पत्र स्वता जेआरडींनी वाचले आणि स्वता सुधाताईंना मुलाखतीसाठी बोलावून टेल्को मधे त्यांची निवड केली.एवढ्या मोठ्या उद्योग समुहाचा चेअरमन असलेली व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातील मुलीचे पत्र स्वता वाचतात आणि तिला बोलावून घेतात.हे फक्त जे आर डी टाटाच करू शकतात.नंतरच्या आयुष्यात सुधाताईंनी नारायण मुर्तींशी विवाह केला.ईन्फोसिस सारखी सॉफ्टवेअर कंपनी उभारण्यात मोलाचे योगदान दिले.समाजसेवेसाठी ईन्फोसिस फाऊंडेशनची स्थापना केली.सुधाताई बेस्ट सेलिंग लेखिका झाल्या.पण आजही त्या या यशाचे श्रेय जेआरडी टाटांनाच देतात.माणसे उगाच महान होत नसतात त्यासाठी माणुसकी आणि समाजिक भान जागृत ठेवावे लागते.जेआरडींनी ते ठेवले होते.साधेपणा त्यांच्या अंगी होता.कामगारांप्रति आपुलकीची भावना त्यांच्या ठायी होती.देशाप्रती आदर,निष्टा आणि देशभक्ती त्यांच्याकडे होती.बदल करण्याची प्रचंड ईच्छाशक्ती त्यांच्याकडे होती.आणि म्हणून जेआरडी टाटा भारतातल्या सर्वात महान १० व्यक्तीमधे गणले जातात.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जेआरडी टाटांना भारत सरकारने १९९२ साली भारतरत्न देवून सन्मानित केले.अशा जेआरडी टाटांना त्यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
@अमित जालिंदर शिंदे

Monday, July 15, 2019

आदर्श समाजसेवक:प्रा.नानासाहेब लिगाडे

         आदर्श समाजसेवक:प्रा.नानासाहेब लिगाडे

     माजी राष्ट्रपती आर.व्यंकटरमण संस्थापक असलेल्या गांधी फोरमच्या सोलापूर जिल्हा शाखेकडून दरवर्षी दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार सन २०१९ साठी अकोला गावचे सुपूत्र, शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादित,सांगोला चे चेअरमन,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रा.नानासाहेब लिगाडे सरांना आज दि.-१५/०७/२०१९ रोजी सायंकाळी ४:३० वाजता हिराचंद नेमचंद वाचनालय,सोलापूर येथे मा.पालकमंत्री विजकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते प्रदान होत आहे. प्रथम लिगाडे सरांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
     भाई जगन्नाथराव लिगाडे (तात्या)  चँरिटेबल ट्रस्ट व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यासाठी लिगाडे सरांना आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाला आहे.सरांनी भाई जगन्नाथराव लिगाडे(तात्या) चँरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून आजपर्यंत नेत्रतपासणी शिबिर, स्त्रियांसाठी सर्वरोग निदान शिबिर, विविध विषयांवर प्रबोधनपर व्याख्याने,माजी सैनिक सन्मान सोहळा,२००७ पासून दरवर्षी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या आहेत.शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास या सरांच्या आवडीच्या गोष्टी असल्याने रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सरांनी स.शा.लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे ज्यू.कॉलेज अकोला,शिवाजी विद्यालय व ज्यू.कॉलेज महुद बु.,मांजरी हायस्कूल मांजरी,यशवंत विद्यालय पंढरपूर यांच्या विविध विकासकामांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.या सर्व शाळांमधील ५वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना सरांनी रोख रकमेची बक्षीसे ठेवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम देखील केले आहे.
     मी ५वीला गेल्यावर लिगाडे सरांना प्रथम माझ्या शाळेमध्ये पाहिले. ओघवती भाषणशैली,नेहमी शाळेच्या विकासाचाच ध्यास,आमच्या शाळेच्या मुख्याध्यापक,शिक्षक,आणि विद्यार्थ्यांना नेहमी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन यामुळे विद्यार्थीदशेत मला सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष आकर्षण होते.सरांचे वडील आणि माणदेशी जनसेवक,सांगोला तालुक्यामध्ये होऊन गेलेला सच्चा लोकनायक,सांगोला सुतगिरणीचे चेअरमन जगन्नाथ तात्यांचे २९ डिसेंबर २००५ रोजी अकाली निधन झाले.तात्यांच्या निधनानंतर दि २१ डिसेंबर २००६ रोजी सरांची सांगोला सुतगिरणीचे चेअरमन म्हणून निवड झाली. कापड आणि सुतगिरणी व्यवसाय जगभरात मंदिच्या सावटात अडकला असतानादेखील आपल्या प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर सर सांगोला सुतगिरणी मोठ्या सचोटीने चालवित आहेत.सुतगिरणीच्या चेअरमन पदावर काम करत असताना गिरणीतल्या कामगारांसोबत त्यांनी नेहमीच सलोख्याचे संबंध ठेवले.
     सरांनी आम्हा भावंडांना क्वचितच पाहिलेले पण आमच्या वडिलांना जेव्हा कधी काही कामानिमित्त त्यांना भेटाव लागे तेव्हा सर त्यांच्याकडे नेहमीच माझ्या आणि माझ्या छोट्या भावाच्या शिक्षणाबद्दल आपुलकीने विचारपूस आणि मार्गदर्शन करीत.
     मागच्या वर्षी १ व २ ऑगस्ट २०१८ रोजी औरंगाबाद येथे शेतकरी कामगार पक्षाचे १७ वे अधिवेशन भरले होते. राजकीय विषयाची आवड म्हणून मी सरांसोबत या अधिवेशनाला गेलो होतो.त्या कालावधीत लाभलेला सरांचा सहवास निश्चितच प्रेरणादायी होता.रयत शिक्षण संस्थेसारख्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेचा जनरल बॉडी सदस्य, कोट्यवधी रुपयांचे भागभांडवल असलेल्या सुतगिरणीचा चेअरमन असलेली व्यक्ती आपल्यासोबत राहते,सोबत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आपुलकीने विचारपूस करते ह्या गोष्टी खरच शिकण्यासारख्या होत्या.दोन दिवसाच्या त्या सहवासात मी सरांना अनेकवेळा अनेक प्रश्न विचारले.शेतकरी कामगार पक्षाची स्थापना, इतिहास, मार्क्सवादी विचारसरणी,एकेकाळचा काँग्रेसचा महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष पण सध्या झालेली वाताहत,रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील, मराठा आरक्षण,सांगोला सुतगिरणी आणि अडचणीतला वस्त्रोद्योग या व अशा अनेक विषयांवर मी सरांना प्रश्न विचारले व सरांनी मुक्तकंठाने त्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
     साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तिला सर नेहमीच समानार्थी राहिले. शिस्तीचे भोक्ते,सामाजिक जाण,प्रशासकीय कौशल्य,विद्यार्थी कामगार आणि राजकीय पुढाऱ्यांशी आपुलकीचे संबंध या गुणांमुळे सर नेहमीच सर्वाना आपलेसे वाटतात.
     कधीही अडचण आली तर भेट म्हणून सांगणारे सर नेहमीच एक आदर्श गुरुदेखील वाटतात.अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला आदर्श समाजसेवक म्हणून मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावतीच होय.सरांना परत एकदा हार्दिक अभिनंदन आणि त्यांची भावी वाटचाल अशीच यशस्वी होवो ह्या शुभेच्छा.
@अमित जालिंदर शिंदे

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...